जाहिरातीत लपलेला अर्थ

सध्या टीव्हीवर चॉकलेटची एक जाहिरात दाखवली जात आहे. त्यात रेखाने अभिनय केला आहे. रेखाने कदाचित पहिल्यांदाच एका जाहिरातीत काम केले आहे. ऊर्मिला मातोंडकरसुद्धा खूप दिवसांनंतर या जाहिरातीच्या शेवटच्या दृश्यात पडद्यावर दिसली आहे. या जाहिरातीचे दिग्दर्शन ‘जब वी मेट’ आणि ‘रॉकस्टार’साठी प्रसिद्ध चित्रपट निर्माता इम्तियाज अलीने केले आहे. जाहिरातीत क्रिकेट खेळाडू मॅच खेळण्यासाठी जात आहेत. मागच्या सीटवर बसलेली रेखा चिडचिड करते आणि हँडग्लोव्हज घाम येतो म्हणून फेकून देते. पुढच्या सीटवर बसलेली व्यक्ती रेखाला चॉकलेट देत म्हणतो की, आमचा हा खेळाडू भूक लागल्यावर असाच वागतो. पुढच्याच दृश्यात जेथे रेखा बसलेली असते त्या जागेवर एक पुरुष चॉकलेट खाताना दिसतो. याचप्रमाणे मैदानासमोर जाताच कारमधून उतरत ऊर्मिला चिडून म्हणते की, तिला फक्त ड्रायव्हरच समजले जाते म्हणून ती खेळणार नाही. त्यानंतर तिलासुद्धा चॉकलेट दिली जाते.
ही जाहिरात पाहून भुकेला स्त्रीच्या रूपात सादर करण्यात आल्याचे वाटते. जणू काही पुरुषांना भूक लागत नाही. जीवनाच्या बहुतांश क्षेत्रांत कमतरतेला महिलांचे नाव देणे आपल्या संपूर्ण पुरुषप्रधान वैचारिकतेचे उद्योतक आहे. बोलण्यातसुद्धा अनेक अपशब्द स्त्रीला संबोधून म्हटले जातात. एकही अपशब्द पुरुषकेंद्रित नाही. जवळजवळ सगळ्याच भारतीय भाषांत अपशब्द याचप्रमाणे रचलेले आहेत. दैनिक क्रिया आणि सामाजिक जीवनाकडे बारकाईने पहिले तर सगळ्याच ठिकाणी स्त्रीविरोधी दृष्टिकोन दिसून येईल. या विचाराच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला तर आपण जुन्या आख्यान आणि पुराणकथेपर्यंत पोहोचू. याशिवाय इतिहासातील युद्धाचा अभ्यास केल्यावर कळेल की, पराभूत झालेल्या राजांना कशी वागणूक दिली जात होती? जमीन जास्त पेरण्यात आली की महिलांना जास्त चिरडण्यात आले, याचा विचार व्हायला हवा.
आपल्या येथील लग्नसमारंभात नवरदेवाला योद्धाप्रमाणे सजवले जाते आणि नवरीला जिंकलेल्या जमिनीप्रमाणे समजले जाते. दोन कुटुंबे पवित्र नात्यात जोडली जातात, तर मग युद्धाचा दृष्टिकोन का ठेवला जातो? सहज सामान्यपणे हे काम का केले जात नाही? वर्हाडी स्वत:ला यजमानांपेक्षा महत्त्वाचे का समजतात? लग्नात ‘कन्यादान’ होते, मात्र सप्तपदीवेळी पत्नीला पुरुषाच्या समान समजले जाते. तथापि, वस्तू आणि वचनाचे दान केले जाते. युद्धिष्ठीरसुद्धा दानात मिळालेली वस्तू जुगारात हरले होते. ‘कन्यादाना’ची विधी आणि सप्तपदीची रचना दोन वेगवेगळ्या लोकांनी केलेली दिसतेय. खरं तर धर्माचे मूळ न्यायसंगत आहे. मात्र, त्याची लोकप्रिय आवृत्ती व त्याची व्याख्या स्वार्थसाठी तयार करण्यात आली आहे. विरोध धर्माचा नव्हे, तर या व्याख्येचा आहे. या आख्यानामध्ये जागोजागी द्वंद्व दिसून येते.
पैसा, पत्नी आणि जमिनीमुळे युद्धे होतात, अशी एक लोकप्रिय म्हण आहे. खरं तर विचारांचा लोप झाल्यामुळे युद्धे घडत गेली. अनेक युद्धे अहंकार आणि भीतीमुळे लढण्यात आली. मात्र, प्रत्येक वादात महिलेला ओढले जाते. ही विचारशैली घातक आहे.
अनेक घरांत मुलाला दूध दिले जाते. मात्र, मुलगी दूध प्यायल्यावर लवकर मोठी होईल आणि तिच्या हुंड्याची तयारी करावी लागेल म्हणून तिला दूध दिले जात नाही. मुलगी दुसर्या घरचे धन म्हणूनच तिचे पालनपोषण का केले जाते? समाजातच छोट्या-छोट्या गोष्टीवरून भेदभाव केला जातो याकडे दुर्लक्ष करणे ठीक नाही. त्या जाहिरातीत नकळतच भूक आणि त्यापासून झालेली चिडचिड स्त्रीसोबत जोडण्यात आली असावी. मात्र, दुष्काळाचा अभ्यास आणि आकड्यांवरून कळते की, भूक सहन करून वाचणार्यांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त महिलांची संख्या होती. हरिवंशराय बच्चन यांच्यासारखे विद्वान व्यक्तीसुद्धा लिहितात की, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील प्रबळ स्त्रीने त्यांच्याकडून कविता लिहून घेतली आहे.
त्यांची गोष्ट सोडली तर एका लोकप्रिय मान्यतेनुसार, पुरुषांत असलेले नारीत्व सृजन घडवते. तर मग या महान जीवन ऊर्जेसोबत असमानतेची वागणूक का दिली जाते? नदी आणि स्त्रीविषयी आपल्या अन्यायाची कहाणी डोंगरापेक्षा जुनी आहे.






