REVIEW : एकदा नव्हे, वारंवार बघण्यासारखा 'काई पो छे'


जर तुम्हाला संदेश देणारे, सकारात्मक विचार असणारे, संघर्ष करुन ध्येय गाठणा-या व्यक्तिरेखा आणि विचार करायला लावणारे सिनेमे आवडत असतील तर अशा प्रेक्षकांनी 'काई पो छे' हा सिनेमा आवर्जुन बघावा.
दिग्दर्शक अभिषेक कपूरने तरुणाईला डोळ्यासमोर ठेऊन हा सिनेमा तयार केला आहे. मात्र त्यांनी प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी कॉलेज कॅम्पस, रोमान्स, ब्रेकअप अशा रटाळ गोष्टी टाळल्या आहेत. त्याऐवजी तरुणांना प्रेरणा मिळेल अशा पद्धतीने 'काई पो छे' हा सिनेमा बनवला आहे.
'काई पो छे'मध्ये पॉलिटिक्स, स्पोर्ट्स, आणि दंगा (गोधरा) याबरोबरच नैसर्गिक आपत्ती (गुजरात भूकंप)ला अशा प्रकारे सादर केले की, प्रेक्षक ते बघताना कंटाळणार नाहीत.
या घटनांना सिनेमाच्या संदर्भासोबत जोडण्यात आले आहे. 'काई पो छे'मध्ये अभिषेक कपूर यांनी व्यक्तिरेखा आणि महत्त्वपूर्ण घटनांना अगदी रियालिस्टिक पद्धतीने सादर केले आहे. कादंबरीतून घेण्यात आलेले तीन पात्रसुद्धा वास्तविक आयुष्याला जीवंत ठेवतात.
'थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ' या चेतन भगतच्या बेस्ट सेलर कादंबरीवर आधारित या सिनेमाला गुजरातमध्ये झालेल्या दंग्याची पार्श्वभूमी आहे. हा सिनेमा तीन मध्यमवर्गीय तरुणांच्या अवतीभोवती गुंफण्यात आला आहे. हे तिन्ही तरुण छोट्या शहरातील आहेत.
इशांत भट्ट (सुशांत सिंग राजपूत), ओंकार शास्त्री (अमित साध), गोविंद पटेल (राजकुमार यादव) हे तिघेही कठीण परिस्थितीवरही मात करुन आपली स्वप्ने आणि महत्त्वकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्याचवेळी अशी काही परिस्थिती निर्माण होते की हे तिघेही त्यात गुरफटून जातात आणि त्यामुळे त्यांच्यासमोर अडचणींचा डोंगर तयार होतो.
गोविंद एक तरुण मुलगा असून तो अहमदाबादमध्ये राहतो. त्याला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे. त्याचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला त्याचा मित्र ओमी मदत करतो.
क्रिकेटला आपल्या देशाचा धर्म समजला जातो. त्यामुळे ते एक ट्रेनिंक अॅकडमी उघडण्याचा निर्णय घेतात. तरुणांना प्रशिक्षित करुन देशाचे पुढचे सुपरस्टार बनवण्याचे ते स्वप्न बघतात.
फक्त पैसा कमावण्यासाठी अॅकडमी सुरु करण्याच्या गोविंदचा उद्देश आहे. तो इशानच्या मदतीने अली नावाच्या एका मुलाला ट्रेनिंग द्यायला सुरुवात करतो. हा मुलगा चांगला फलंदाज आहे. मात्र सुविधांच्या अभावामुळे त्याला यश मिळत नाहीये. त्या मुलाला प्रशिक्षण देण्यासाठी इशानला ओमीची मदत मिळते.
मात्र त्याचदरम्यान गोधरा दंग्यांमुळे त्यांच्या आयुष्यात वादळ येतं. मात्र या कठीण परिस्थितीतसुद्धा इशान, ओमी आणि गोविंद हे तिघेही मित्र आपली मैत्री तुटू देत नाही आणि एकमेकांची साथ देतात.
एकुणच 'काई पो छे' हा उत्कृष्ठ सिनेमा आहे. कलाकारांचा अभिनय असो, दिग्दर्शन असो किंवा संवाद असो, सगळे काही चांगले जुळून आले आहे. हा सिनेमा एकदाच नव्हे तर वारंवार बघण्यासारखा आहे.







