'ए. आर. रहमानने अनेक कलाकारांना घरी बसवले'

मुंबई - आजच्या संगीतकारांमध्ये आश्वासक वाटावीत अशी काही नावं आहेत. ए. आर. रहमान हे त्यापैकी एक. त्याने मेलडी, -हिदममध्ये जे काम केले आहे, जे वेगळेपण आणलं आहे, त्याला नक्कीच सलाम आहे. मात्र, त्याच्या एका वाद्याने अनेक कलाकारांना आज घरी बसावे लागल्याचे कलाकार म्हणून दु:ख अधिक असल्याची खंत संगीतकार अशोक पत्की यांनी व्यक्त केली. एरवी सुरांच्या हिंदोळ्यावर रमणा-या पत्की यांनी ‘शब्द’ गप्पांच्या ओघात मनातली खंत बोलून दाखवली.
शब्दगप्पांच्या सहाव्या दिवशी राजकारणाऐवजी संगीताचे स्वर आळवले गेल्याने वातावरण काहीसं सैलावलेलं आणि सूरमय झालं होतं. गेली 40 वर्षे संगीतक्षेत्रामध्ये जिंगल्स, मालिका, चित्रपट, अल्बम्स अशा विविध माध्यमांतून काम करण्याचा गाढा अनुभव जमेस असलेल्या पत्की यांच्या वाटचालीबद्दल जाणून घेताना रसिक तन्मय झाले होते. आजच्या संगीताच्या स्थितीविषयी बोलताना ते म्हणाले, गाण्यातील मेलडी मरत चालली आहे, गाणं हे अधिकाधिक हिदमकडे झुकत चाललं आहे. काही काळ ते ऐकायला बरं वाटतं, परंतु नंतर तो नॉइस होतो. शिवाय म्युझिक कंपन्यादेखील सेलेबल असेल तेच मागत असतात. अशावेळी क्लासचा नाही तर मासचा विचार केला जातो, हे योग्य वाटत नाही. 1972 पासून ते आजवरच्या काळात संगीतामधली क्रांती पाहिलेल्या या संगीतकाराने विज्ञानाच्या या प्रगतीमुळे आपल्याही संगीत विचारांत परिवर्तन आल्याचे नमूद केले असले तरीही या क्षेत्राचे झालेले व्यावसायिकीकरण, सर्जनशीलतेची वानवा, रियाजाचा अभाव यांनी मन व्यथित होते, ही भावनाही ते लपवू शकले नाहीत. बेसुरांना सुरात आणण्याचं सॉफ्टवेअरही आज उपलब्ध झाल्याने सगळंच सोप्पं होऊन गेलं आहे. काम करण्याची पद्धती बदलली आहे. पूर्वीसारखं आज फार राहिलेले नाही.
नाट्यपदांची रसिकांना भुरळ
‘केतकीच्या बनी तिथे’, ‘पूरब से सूर्य उगा’, ‘काळोख दाटुनी आला’, ‘दूरच्या रानात बकुळीच्या तळी’, ‘सुख दे सा-या घरांना’, ‘ये ढेर से कपडे मैं कैसे धोऊँ’, मोरूची मावशी मधील ‘टांग टिंगाक् टांग टिंग टिंगा’, ‘तू सप्तसूर माझे’, ‘रंगात रंगतो श्यामरंग’, ‘दिस चार झाले मन’, ‘अवचित आले नाव तुझे ओठावर अलगद’ अशा पत्कींच्या संगीताने अवीट गोडी लाभलेली गाणी, जिंगल्स, नाट्यपदं या वेळी गायिका माधुरी करमरकर, पत्की यांनी सादर केली. त्यांना तबलासाथ शंतनू किंजवडेकर यांनी केली.





