कोल्हापूर ते बठिंडापर्यंतचा प्रवास

मक्के दी रोटी आणि सरसोंका साग म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो पंजाब. भांगडा, लोरीचा सण याचं आकर्षण सगळ्यांनाच असतं. हा पंजाबी बाज प्रेक्षकांना हिंदी सिनेमात नेहमीच पाहायला मिळाला आहे. मात्र आता मराठी सिनेमातही हे सगळं काही पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शक अवधूत गुप्ते 'जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा' या सिनेमात पंजाबच्या पार्श्वभूमीवर आधारित प्रेमकथा आपल्या भेटीला घेऊन आले आहेत.
'जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा' या सिनेमाची प्रेमकथा कोल्हापूरी मराठी मुलगा सयाजी निंबाळकर आणि पंजाबी मुलगी जसविंदर कौर यांच्याभोवती गुंफण्यात आली आहे. पंजाबची पार्श्वभूमी आणि वातारण निर्मिती सिनेमात यावी यासाठी खास पंजाबमध्ये जाऊन हा सिनेमा शुट करण्यात आला आहे. या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच मराठी सिनेमा पंजाबमध्ये पोहोचला आहे. विशेष म्हणजे 'यमला पगला दिवाना' आणि 'सन ऑफ सरदार' या सिनेमांमध्ये दिसलेली हवेली प्रेक्षकांना आता मराठी सिनेमातही बघता येणार आहे.
अभिजीत खांडकेकरने या सिनेमात कोल्हापुरी मुलाची भूमिका साकारली आहे. तर प्रार्थना बेहरे पंजाबी मुलीच्या भूमिकेत सिनेमात झळकणार आहे. येत्या 14 फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर कोल्हापूर ते बठिंडापर्यंतचा हा प्रवास प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.






