‘सहारा’शी व्यवहार जरा जपून ‘सेबी’चा गुंतवणूकदार, सामान्य जनतेला इशारा

मुंबई - सहारा समूहाचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांच्यासह सहारा समूहातील दोन कंपन्या आणि त्यांच्या प्रवर्तकांची सर्व अन्य मालमत्ता, गुंतवणूक आणि बॅँक खाते गोठवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता सेबीने या कंपन्या आणि त्यांच्या व्यक्तींशी व्यवहार करताना गुंतवणूकदार आणि सामान्य जनतेने सावध राहावे, असा इशारा दिला आहे.
सहारा इंडिया रिअल इस्टेट कॉर्पोरेशन लि., सहारा हाउसिंग इन्व्हेस्टमेंट कॉर्प. लि. आणि त्याचे तीन प्रवर्तक तसेच संचालकांशी कोणताही व्यवहार करायचा झाल्यास तो आपल्या जबाबदारीवर करावा, असेही सेबीने म्हटले आहे.
सहाराच्या या कंपन्यांनी गोळा केलेला पैसा गुंतवणूकदारांना परत करावा, या कंपन्या आणि सुब्रतो रॉय सहारा, वंदना भार्गव, अशोक रॉय चौधरी आणि रविशंकर दुबे यांची चल-अचल मालमत्ता, बॅँक तसेच डिमॅट खाती गोठवावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असल्याचे नियामकांनी सांगितले. सहाराच्या या कंपन्या / व्यक्ती यांच्याशी कोणत्याही प्रकारचे व्यवहार करण्याअगोदर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची नोंद घ्यावी आणि गुंतवणूकदार तसेच सामान्य जनतेने सावधानता बाळगावी, असेही सेबीने म्हटले आहे.
सुप्रीम कोर्टाचे आदेश : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर बाजार नियंत्रकांनी 13 फेब्रुवारीला 160 पानांचे दोन स्वतंत्र आदेश काढून त्यामध्ये सहाराची मालमत्ता आणि खाती गोठवण्याचे आदेश दिले होते.





