मुंबई - सध्या तेजाळलेल्या शेअर बाजारामध्ये विदेशी गुंतवणूकदार अधिकच सक्रिय झाले आहेत. नवीन वर्षात आतापर्यंत 24 हजार 225 कोटी रुपयांची (4 अब्ज डॉलरची) गुंतवणूक करणा-या ‘एफआयआय’नी फेब्रुवारी महिन्यात या गुंतवणूकदारांनी 14 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. गुंतवणुकीचा हा कल यापुढेही असाच कायम राहण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी 1 ते 17 फेब्रुवारी या कालावधीमध्ये भारतीय शेअर बाजारांत 47 हजार 895 कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली तर 43 हजार 28 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली. परिणामी त्यांनी भांडवल बाजारात 13 हजार 867 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केल्याचे बाजार नियंत्रक सेबीकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीमध्ये म्हटले आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पतधोरण आढाव्याबाबतचे मृदू धोरण त्याचप्रमाणे आर्थिक यंत्रणेतील रोकड सुलभतेची सुधारलेली स्थिती यामुळेच बाजारात विदेशी गुंतवणुकीचा ओघ मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याचे मत भांडवल बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी कर्ज बाजारपेठेत 799 केटी रुपयांची गुंतवणूक फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत केलेली आहे. त्यामुळे त्यांची भारतीय शेअर बाजारातील एकूण निव्वळ गुंतवणूक या कालावधीत 14 हजार 666 कोटी रुपयांवर गेली आहे.
बाजारातील तेजीला पाठबळ - फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या 17 दिवसांत 13 हजार 867 कोटी रुपयांची भांडवली गंगा बाजारात आली असून ती जानेवारी महिन्यातील 10 हजार 358 कोटी रुपयांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. भांडवल बाजारात ‘एफआयआय’कडून सातत्याने निधीचा ओघ आल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत जवळपास 1096 अंकांनी वधारला.