मुंबई - विमा पॉलिसी विक्रीतील तोटा भरून काढण्यासाठी कंपन्यांनी हप्ता वाढवावा, असे सरकारने सुचविल्याने वाहन आणि आरोग्य विमा महाग होण्याची शक्यता आहे. तोट्यातील विमा पॉलिसींवर विमाधारकाला पुनर्विम्याचे सुरक्षा कवच देऊ नये, असा सल्ला सरकारने जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशनला दिला आहे. तोट्यातील पॉलिसींवर पुनर्विमा सुविधा दिल्यास या तोट्याचे रूपांतर दाव्यामध्ये होऊ शकते. त्यामुळे विम्याचा हप्ता वाढवण्याची जोखीम विमा कंपन्यांना घेऊ द्यावी, असेही या पत्रात म्हटले आहे. मोटार विम्याबद्दल हप्त्यापेक्षा दाव्याचे प्रमाण 120 टक्के तर आरोग्य विम्याच्या बाबतीत हे प्रमाण 103 टक्के असते. पुनर्विमा व्यवसायासाठी विमा कंपन्यांना 5 टक्क्यांपर्यंत कमिशन द्यावे असेही सरकारने म्हटले आहे. सर्वसाधारण विमा उत्पन्नावर ताण आल्यामुळे विमा कंपन्या हा भार ग्राहकांच्या खांद्यावर टाकण्याची शक्यता या तज्ज्ञांनी व्यक्त केली.