रोमिंग फ्री, परंतु कॉल महागणार

नवी दिल्ली - देशभरात फ्री रोमिंग लागू झाल्यानंतर कॉलचे दर वाढणे निश्चित आहे. त्यामुळे देशभरात पुन्हा एकदा कॉल दर एक रुपया प्रति मिनिट होण्याची शक्यता आहे. देशातील प्रमुख मोबाइल सेवा देणा-या कंपन्यांच्या मते, रोमिंग बंद झाल्यानंतर कॉलचे दर वाढवणे क्रमप्राप्त आहे. देश पातळीवर कॉलचे दर समान करण्याचा विषय आलाच तर एक मिनिटाच्या कॉलसाठी एक रुपया प्रति मिनिट दर राहील. ही किमान दरवाढ असेल, असे या कंपन्यांचे म्हणणे आहे. कॉलचे दर यापेक्षा अधिकही असू शकतात. 2013 मध्ये देशात रोमिंग फ्री होणार आहे. नवे टेलिफोन धोरण 2012 नुसार केंद्र सरकारने तसे जाहीर केले आहे. टेलिफोन नियामक ‘ट्राय’ने डिसेंबर 2012 मध्ये प्री-कन्सल्टेशन सूचना जारी केली आहे. त्यानुसार सर्व कंपन्या तसेच भागीदारांकडून त्यांची मते मागवली आहेत. फ्री रोमिंगला सध्या कंपन्या विरोध करत आहेत. धोरण लागू झाल्यावर मात्र कॉलचे दर वाढवण्याशिवाय पर्याय नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
मोबाइल सेवा देणा-या एका प्रमुख कंपनीच्या अधिका-या ने सांगितले, रोमिंग बंद झाल्याचा फायदा 5 ते 8 टक्के ग्राहकांना होईल. मात्र, कंपन्यांच्या कमाईवर याचा 8 ते 10 टक्के फटका बसेल.
ग्राहकांनाच बसणार फटका
सेल्युलर परेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे महासंचालक राजन मॅथ्यू यांनी सांगितले, फ्री रोमिंगसाठी अनेक मुद्दे स्पष्ट होणे आवश्यक आहे. प्रत्येक सर्कलसाठी स्पेक्ट्रमची किंमत वेगवेगळी आहे. त्याशिवाय सर्कलनिहाय टेरिफ शुल्कही वेगवेगळे आहे. रोमिंग मोफत झाल्यास त्याचा फटका ग्राहकांना बसणार आहे.





