10 वर्षांत जाणवणार कामगार तुटवडा

मुंबई - बांधकाम आणि स्थावर मालमत्तेसारख्या पारंपरिक कामांना सोडचिठ्ठी देऊन बहुतांश कामगारांचे वर्ग बँका, दूरसंचार, माहिती तंत्रज्ञानासारख्या सेवा उद्योगांकडे स्थलांतर करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. परिणामी पुढील 10 वर्षांत कामगार तुटवड्याचे प्रमाण जवळपास 65 टक्क्यांनी वाढणार असल्याची भीती एका सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आली आहे.
भविष्यात जाणवणा-या या कामगार तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर बांधकाम क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरण आणि प्रकल्प व्यवस्थापनावर भर द्यावा लागणार असल्याचे सिनर्जी प्रॉपर्टी डेव्हलपमेंट सर्व्हिसेसच्या ‘बांधकाम क्षेत्र’ विषयावरील एका अहवालात म्हटले आहे.
नजीकच्या काळात कच्च्या मालाचा खर्च दुपटीने वाढण्याचा अंदाज असल्याने जागतिक पातळीवरील सर्वोत्तम कामकाज तंत्राचा अवलंब करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे पुढील दहा वर्षांचा काळ हा अनिश्चिततेचा असल्याने नावीन्यता आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार या दोन गोष्टींमुळे हा उद्योग बहरेल. परंतु बांधकाम साहित्याचा वाढता खर्च आणि महागाई या दोन चिंतेच्या गोष्टी ठरणार असल्याचे मत सिनर्जीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संकी प्रसाद यांनी व्यक्त केले.





