शेतक-याची भाजी थेट ग्राहकांच्या हाती

मुंबई- शेतक-याची भाजी थेट ग्राहकाच्या हाती देण्याची नवी योजना महाराष्ट्रात राबवली जाणार असून 25 जानेवारीपासून मुंबईत या योजनेला सुरुवात होत आहे. स्टेट अॅग्रीकल्चर मार्केटिंग बोर्डाने ही योजना हाती घेतली आहे. अशी योजना राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.
शेतकरी पाच रुपयांत मटार विकत आहे आणि दलालांच्या साखळीतून ग्राहकांपर्यंत ते 25 रुपये किलोच्या दराने मिळत आहे. या व्यवहारातून आता दलालांना हद्दपार केले जाणार आहे. नव्या योजनेनुसार शेतकरी घराघरात जाऊन थेट भाजी विकू शकतील; जेणेकरून भाज्यांच्या किमतींवर दलालांचे नियंत्रण राहणार नाही.
या योजनेची अंमलबजावणी मुंबईतील कॉलन्यांमधून होणार आहे. शेतक-यांच्या संस्था भाजी खरेदी करून कॉलन्यांपर्यंत पोहोचवणार आहेत. बोर्ड लवकरच ‘डायल-ए-व्हेजिटेबल’ सेवा सुरू करणार आहे. पुणे शहरात या योजनेसाठी पायलट प्रोजेक्ट राबवण्यात आला होता. आता तिच्या राज्यभरात अंमलबजावणीचा निर्णय सरकारने घेतला आहे.
सध्या मळ्यातील भाजी बाजारात आणल्यानंतर तिचा लिलाव होतो. ठोक व्यापारी व दलाल भाजी खरेदी करून किरकोळ व्यापा-यांना विकतात. या साखळीमुळे भाव चार ते पाच पटींनी वाढतात. नव्या योजनेनुसार शेतकरी स्वत:ची भाजी थेट ग्राहकांना विकतील. त्यामुळे भाज्यांचे दर 10 ते 20 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे.





