समकालीन मराठी कवितांवर समीक्षात्मक ग्रंथ लवकरच

प्रा. प्रकाश देशपांडे यांचा मराठी कवितांवरील अभ्यास दांडगा आहे. इंग्रजीचे प्राध्यापक असल्याने युरोपियन कविता अभ्यासल्या आहेत. त्याआधारे मराठी कविता कशी माहितीपूर्ण असावी यावर त्यांनी लेखन केले आहे. ते म्हणतात, मराठी साहित्यात अनेक चांगल्या कवींचे योगदान मोठय़ा प्रमाणात आहे, पण त्यांच्या साहित्यावर कोणी फारसे बोलत नाही. त्यांना प्रसिद्धी दिली जात नाही.
ठरावीक कवींच्या साहित्यावर समीक्षा केली जाते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय स्तरावर मराठी कवितांचा अभ्यास कोणी केला तर त्याला या कवितांचे महत्त्व ज्ञात असले पाहिजे. म्हणूनच असा एक अधिकृत ग्रंथ अभ्यासासाठी किंवा संदर्भासाठी असावा, म्हणून ‘समकालीन मराठी कविता : एक निरीक्षण’ या समीक्षात्मक ग्रंथाची निर्मिती करण्यात येत आहे.
या ग्रंथात, सौंदर्यवाद म्हणजे काय? मराठी कवितांतील सौंदर्यवाद कसा असतो, बंगाली किंवा कानडीत तो कसा व्यक्त झाला आहे? आधुनिकतावाद म्हणजे काय? कवितेत कोणकोणती लक्षणे असतात यावर अभ्यासपूर्ण लेखन करण्यात आले आहे. समकालीन मराठी कवितांमध्ये 80, 90 ते 2012 पर्यंतच्या कवींच्या कवितांवर समीक्षा करण्यात आली आहे. कवितेतील मुख्य प्रवाह म्हणजे महानगरी कविता होय. यात शहरी आणि निमशहरी कवितांचा समावेश होतो. तसेच ग्रामीण कवितांचा नवा प्रवाह आलेला आहे. तसेच कवितेत आलेली नवी वळणे म्हणजे दलित, आदिवासी - मुस्लिम आणि स्त्रीवादी कवितांवर विवेचन करण्यात आले आहे. या ग्रंथात गेल्या तीस वर्षांच्या काळातील 80 ते 85 कवींच्या कवितांचे चित्रण यात समाविष्ट आहे.
प्रा. देशपांडे यांच्या ‘आधुनिक मराठी कविता : एक विश्लेषण’ या ग्रंथाचा चौथा भाग नुकताच प्रकाशित झाला आहे. यात तीन पर्वातील मराठी कवितांचा अभ्यास आहे. पहिले पर्व केशवसुतांचे आहे. त्यांच्या कविता सौंदर्यवादी आहेत. दुसरे पर्व मर्ढेकरांचे, त्यांनी आधुनिकतावादी कवितेंचा प्रवाह मराठीत आणला. त्यावर सविस्तर विश्लेषण करण्यात आले आहे. तिसर्या पर्वात अरुण कोल्हटकर, दीलिप चित्रे, ना.धों. महानोर, कवी ग्रेस, वसंत गुर्जर, मनोहर ओक, तुळशी परब, भालचंद्र नेमाडे, नामदेव ढसाळ आणि इतर सर्व कवींच्या कवितांवर समीक्षात्मक लेखन करण्यात आलेले आहे.





