जिल्हास्तरीय कुपोषणमुक्त पुरस्कार जाहीर, संगमेश्वरमधील पांगरी प्रथम

रत्नागिरी - जिल्ह्यामधील संगमेश्वर तालुक्यातील पांगरी गावाला राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त ग्राम अभियानाचा जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार मिळाला आहे.
राज्यात कुपोषित बालकांची संख्या गेल्या काही वर्षात वाढत आहे. त्यामुळे शासनाने राज्य कुपोषण मुक्त करावे या उद्देषाने मागील वर्षापासून कुपोषणमुक्त ग्राम अभियान राबवण्याचा निर्णय घेतला. गाव कुपोषणमुक्त करण्यासाठी गावाला पुरस्कार आणि सर्व संबंधीत अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, मदतनीस, महिला बचतगट प्रतिनिधी, ग्रामसेवक, सरपंच, प्रशिक्षित दाई यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हास्तरावरील प्रथम पुरस्कार (एक लाख रुपये) संगमेश्वर तालुक्यातील पांगरी, द्वितीय (५० हजार रुपये) ता. गुहागर मधील निगुंडळ, आणि तृतीय पुरस्कार (२५ हजार रुपये) संगमेश्वरमधील तुरळ या गावाला मिळाला आहे.
प्रथम व द्वितीय क्रमांकाची गावे विभागीय स्तरावरील पुरस्कारासाठी पात्र ठरली आहेत.





