उद्धव ठाकरे यांच्या हस्ते निरुपणकार अप्पासाहेब यांचा सत्कार

ठाणे :निरुपणकार व समर्थ संप्रदायाचे श्रद्धास्थान अप्पासाहेब धर्माधिकारी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या नागरी सत्कारानिमित्त ( रविवारी ) ठाण्यातील कासार वडवलीत १० लाखाहून अधिक लोक जमले आहेत.
दरम्यान, सुरळीत वाहतुकीसाठी काही मार्ग बंद ठेवून वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. शनिवारी रात्रीपासूनच लोकांनी कासारवडवली इथे येण्यास सुरुवात केली.
अनुयायांची संख्या ध्यानात घेऊन पोलिसांनी गायमुखकडून घोडबंदरमार्गे मुंबई व नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड व अजवड वाहनांना गायमुख जकात नाका येथून प्रवेश बंद केला आहे. या काळात अहमदाबादकडून येणारी वाहने कासा-वाडामार्गे, मस्तान नाकामार्गे अथवा वसईमार्गे अंजूर फाटा येथे येऊन इच्छितस्थळी जातील.
अप्पासाहेब यांचा अल्प परिचय
त्यांच्या घराण्यात चारशे वर्षेपासुन समाजप्रबोधनाच्या कार्याची वंशपरंपरा आहे. त्यांच्या घराण्याचे मूळचे आडनांव 'शेंडे' असे होते. त्यांच्या भूतकाळातल्या आठव्या पिढीतील पूर्वज गोविंद चिंतामण शांडिल्य ऊर्फ शेंडे हे धर्मजागृतीचे काम स्वेच्छेने करायचे. त्याकाळचे दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांनी त्यांना सन्मानाने 'धर्माधिकारी' अशी पदवी दिली. तेंव्हापासून आजतागायत त्यांचे घराणे धर्माधिकारी हे आडनांव लावत आले आहेत आणि त्याला समर्पक असे धर्मजागृतीचे काम करीत आले आहेत.
अप्पासाहेब्बांनी आपल्या पित्याकडून प्रेरणा घेऊन सेवाव्रत घेतले आणि ते अव्याहतपणे चालवले. त्यांचे पिता नारायण विष्णु धर्माधिकारी (१ मार्च, १९२२ - ८ जुलै, २००८) हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ व प्रसिद्ध समर्थ दासबोधाचे निरूपणकार, अध्यात्म, शिक्षण, आरोग्य, समाजप्रबोधन, व्यसनमुक्ती क्षेत्रात निरलसपणे कार्य करणारे नानासाहेब यांचे जगभरात लाखो अनुयायी आहेत. धर्माचरणाविषयी बोलतांना त्या अनुषंगाने अज्ञान, अंधश्रध्दा, भेदाभेद, व्यसनासक्ती, स्त्रियांवरील अत्याचार आदि दुष्ट प्रवृत्तींचे उच्चाटन करून समाजाला सन्मार्गाला लावण्याची शिकवण ते देत आले. आधुनिक संदर्भात दासबोधाच्या कमालीच्या सोप्या निरूपणातून विकारी मनांची मशागत करताना निर्व्यसनी समर्थ समाजाचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले.
या कामासाठी त्यांनी १९४५ साली रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे श्री समर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समिती स्थापन केली. या संस्थेद्वारे त्यांनी जगभरात अध्यात्माचा प्रसार केला. त्याच्या शाखा आज भारताबाहेरील अनेक देशांपर्यंत पसरल्या आहेत.
२००८ मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. मरणोपरांत नानासाहेब धर्माधिकारी यांचे सुपुत्र आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याहस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला.




