औरंगाबादेतील मशिदीत अतिरेकी जबीचा मुक्काम

मुंबई - मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार सय्यद जबिउद्दीन अन्सारी ऊर्फ अबू जिंदाल याने औरंगाबाद शहरातील एका मशिदीत मुक्काम ठोकला होता आणि बांगलादेशात पळून जाण्यासाठी त्याला शहरातील साथीदारांनीच मदत केली.
खुद्द जबीनेच चौकशीदरम्यान ही कबुली दिल्याचे मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकार्याने बुधवारी वृत्तसंस्थेला सांगितले. वेरूळ स्फोटक साठय़ाप्रकरणी एटीएसच्या पथकाने 8 मे 2006 रोजी चांदवड-मनमाड मार्गावर टाटा सुमो व इंडिकाचा पाठलाग केला. यात तीन संशयितांना पकडण्यात आले. 30 किलो आरडीएक्स, 10 एके 47 आणि 3,200 काडतुसे असा ऐवज जप्त करण्यात आला होता. या वेळी जबी पळून जाण्यात यशस्वी झाला होता. मालेगाव गाठून त्याने गाडी तेथेच सोडून दिली. त्यानंतर मालेगाव आणि मनमाडजवळील अंकाई गावातून पोलिसांनी मोठा स्फोटकसाठा जप्त केला होता. या प्रकरणात 21 संशयित सध्या गजाआड असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पुढे मालेगावहून जबी रस्त्याने औरंगाबादेत परत आला. एका मशिदीत तो आर्शयाला होता. शहरातील साथीदारांनीच त्याला कोलकता येथे पळून जाण्यासाठी मदत केली. तेथील साथीदाराने त्याला पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे जाण्यासाठी मदत केली. तेथून तो बांगलादेशात गेला.
‘तोयबा’च्या दोन अतिरेक्यांची मदत - बांग्लादेशात गेल्यानंतर जबीने सईद या नावाने बनावट पासपोर्ट घेतला. लष्कर ए तोयबाच्या दोन अतिरेक्यांच्या मदतीनेच त्याने नंतर पाकिस्तान गाठले. तेथे ‘तोयबा’च्या अड्डय़ावर त्याने दौरा-ए-आम आणि दौरा-ए-खास या नावाचे प्रशिक्षणही घेतले. मुंबई हल्ल्यातील आरोपी अतिरेकी अजमल कसाबनेही हे प्रशिक्षण घेतले होते.






