उस्मानाबाद - शेतक-यांकडून कर्जापोटी ऊसबिलातून कपात केलेल्या रकमेचा तेरणा सहकारी साखर कारखान्याने (ढोकी, ता. उस्मानाबाद) परस्पर वापर केला आहे. कर्जाची रक्कम जिल्हा बँकेत जमा न केल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. शेतक-यांच्या कर्जाची सुमारे दोन कोटी रुपये रक्कम क ारखाना वापरत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.
तेरणा कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासद शेतक-यांना जिल्हा बँकेने पीक कर्ज वाटप केले आहे. कर्जाच्या रकमेची ऊस बिलातून वसुली करावी, असे पत्र जिल्हा बँकेने तेरणा कारखान्याला हंगाम सुरू होताना दिले होते. त्यामुळे संबंधित शेतक-यांच्या कर्जाची रक्कम ऊसबिलातून वसूल करण्यात आली. मात्र कारखान्याने ही रक्कम शेतक-यांच्या बँकेतील खात्यावर भरली नाही. निम्मा हंगाम संपत आला तरी रक्कम खात्यावर जमा न झाल्याने जिल्हा बँकेने शेतक-यांकडे वसुलीसाठी तगादा लावला. त्यानंतर हा प्रकार शेतक-याच्या लक्षात आला. वसूल केलेली रक्कम खात्यावर जमा करावी, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. जुना भरणा न झाल्याने शेतक-यांना नवीन कर्जासाठी बँकेचे दरवाजे बंद झाले आहेत. मूळ कर्जावर व्याज सुरू आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. कारखान्याने वसूल केलेली ही रक्कम दोन कोटी रुपयांच्या घरात असल्याचे जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक एच. व्ही. भुसारे यांनी सांगितले.