'मातोश्री'वरुन हिंमत घेऊन जाः अडवाणींना बाळासाहेबांचे खडे बोल

युद्ध सुरु होण्याआधीच नांगी टाकणारे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. हिंमत सोडु नका. हिंमतीचा दुष्काळ पडला असेल तर 'मातोश्री'वर या आणि हिंमत व जिगर कामापुरती घेऊन जा, अशा शब्दांमध्ये बाळासाहेबांनी अडवाणी यांना सुनावले आहे.
लालकृष्ण अडवाणी यांनी ब्लॉगवरुन आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप किंवा कॉंग्रेसचा पंतप्रधान होणार नाही, असे भाकीत वर्तविले होते. त्यावरुन बाळासाहेब संतप्त झाले आहे. शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मध्ये लिहीलेल्या अग्रलेखात त्यांनी भाजपवर कडाडून हल्ला चढविला आहे. बाळासाहंबांनी लिहीले आहे की, मित्रपक्ष भाजपला काय झाले आहे? आजार जडला आहे की तो अंतर्कलहाने बेजार झाला आहे? हा त्यांचा अतर्गत प्रश्न आहे. परंतु, अडवाणी यांनी जे काही लिहीले आहे, तो त्यांच्या पक्षापुरता मर्यादित विषय नसुन राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा मुद्दा आहे. कॉंग्रेसचे सरकार उलथुन टाकण्याची वेळ आली असताना सरसेनापतीनेच शस्त्र खाली ठेवले आहेत. त्यांनीच जर आपल्याला चान्स नाही, असे म्हटले तर लोकांनी कोणाकडे पाहायचे? रणशिंग फुंकुन सैन्यात चेतना निर्माण करण्याचे काम युरु असताना सरसेनापतीनेच असे भाष्य करणे म्हणजे स्वतःच्याच सैन्याला नामोहराम करण्याचा प्रयत्न आहे. 2014 उजाडायला वेळ आहे. त्यावेळी काय होईल ते होईल. ते तेव्हाचे तेव्हा पाहुन घेऊन पंतप्रधान फक्त रालोआचाच राहील. मात्र, कोण? ते तेव्हा ठरवू. मोदी आणि नितीशकुमार यांच्यात दिल्लीच्या तख्तावरुन भांडण आहे. कोणी बसायचे, ते त्यावेळी पाहून घेऊ, असे सांगून बाळासाहेबांनी मरगळ झटकून टाकण्याचा सल्लाही दिला आहे.
‘रालोआ’ म्हणजे फक्त भाजप नसून त्यात इतरही अनेक घटक आहेत. ‘रालोआ’चे निमंत्रक शरद यादव यांनीच आता पुढाकार घेऊन घराची डागडुजी करावी. नवे मित्र जोडावेत. कारण त्यांना ‘ब्लॉग’ म्हणजे काय ते माहीत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
बाळासाहेबांनी अण्णा हजारेंवरही कडाडून टीका केली आहे. टीम अण्णाच्या नैतिकतेचेही धोतर सुटले आहे, असा टोला त्यांनी लगावला.






