दिल्लीतील पीडितेवर बलात्कार करणारे बिहारीचः राज ठाकरे

मुंबई- कोकणची प्रगती हवी असेल तर परप्रांतीयांना जमिनी विकण्याऐवजी आपल्याच हातात ठेवल्या तरच कोकणचा विकास होईल. यासाठी सर्वांनी पक्षांची लेबले न लावता कोकणच्या विकासाचा विचार केला पाहिजे, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी व्यक्त केले.
गोरेगाव येथील ग्लोबल कोकण महोत्सवात ते बोलत होते. कोकणच्या विकासाबरोबरच त्यांनी पुन्हा एकदा परप्रांतीयांचा मुद्दा उपस्थित करून नव्या वर्षात वादाला सुरुवात केली.
या वेळी ते म्हणाले, कोकणचा विकास सर्वांना पाहिजे, परंतु तेथे पायाभूत सुविधा नाहीत. अशा सुविधा एखादी संस्था देणार नसून राज्य सरकारने याचा विचार करायला हवा. आपण कोकणाची जी प्रगती इच्छितो ती मराठी माणसाच्या हातात राहणार का, हा खरा प्रश्न असल्याचे राज म्हणाले.
पुन्हा परप्रांतीय रडारवर
दिल्ली गँगरेप प्रकरणातील आरोपी बिहारीच असल्याचे उघडकीस आले. परंतु ती बाब सोयीस्करपणे विसरली गेली आणि फक्त बलात्काराचीच चर्चा झाली, असे सांगून राज यांनी परप्रांतीयांवर पुन्हा एकदा तोफ डागली. मी द्वेष पसरवत नाही; परंतु मुंबई, दिल्लीच नव्हे तर अनेक राज्यांत बिहारी परप्रांतीयांची गुन्हेगारी वाढली आहे. शीला दीक्षित यांनी परप्रांतीयांवर वक्तव्य केले होते. मात्र, त्यांना कोणीही बोलत नाही असेही ते म्हणाले.





