वाढीव पॅकेज नको, संपूर्ण प्रकल्पच हटवा - जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्तांची मागणी

मुंबई - रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्तांनी वाढीव पॅकेजला ठाम नकार दिला आहे. ‘पॅकेज वाढवून देण्यापेक्षा हा प्रकल्पच रद्द करण्यात यावा,’ अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.
जैतापूर येथे फ्रान्समधील अरेवा कंपनीच्या सहयोगाने 10 हजार मेगावॅट क्षमतेचा अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहे. पाच गावांमधील 2 हजार 300 शेतक-यांच्या जमिनी त्यासाठी संपादित करण्यात येत आहेत. हेक्टरी 28 हजार रुपये असा संपादित जमिनीचा दर राज्य शासनाने या प्रकल्पग्रस्तांना दिला होता. यातील 10 टक्के शेतक-यांनीच मोबदला स्वीकारला आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकाईस ओलांदे या आठवड्यात भारतभेटीवर येत आहेत. त्यामुळे केंद्र शासनाने घाईघाईने जैतापूर प्रकल्पग्रस्तांना 80 पट वाढीव भरपाईस मंजुरी दिली. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना हेक्टरी 22 लाख रुपये मोबदला मिळणार आहे. परंतु या वाढीव मोबदल्यास नकार देत हा प्रकल्पच रद्द करावा अशी भूमिका जैतापूर अणुउर्जा प्रकल्पग्रस्तांनी घेतली आहे.





