जळगाव - घरकुल घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या चौघा आरोपींना नाशिक येथील कारागृहात हलवण्यासाठी परवानगी मागणारा अर्ज येथील उपकारागृहाचे तुरुंग अधीक्षक भाईदास ढोले यांनी बुधवारी न्यायालयाकडे सादर केला होता. त्यावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने ढोले यांना चांगलेच फटकारल्यामुळे त्यांनी अर्ज तत्काळ मागे घेतला.
आरोपी प्रदीप रायसोनी, नाना वाणी, राजा मयूर आणि पी. डी. काळे यांना नाशिक कारागृहात हलवण्यासाठी परवानगी मिळावी, असा अर्ज ढोले यांनी प्रथम वर्ग न्यायाधीश व्ही. एस दीक्षित यांच्याकडे केला होता. त्या अर्जावर बुधवारी सुनावणी झाली. आरोपींना डायबेटिस, रक्तदाब, हृदयविकाराचा त्रास आहे. जळगाव कारागृहात कायमस्वरूपी डॉक्टर नसल्यामुळे या आरोपींना वारंवार जिल्हा रुग्णालयात न्यावे लागते. फक्त शुक्रवारी व मंगळवारीच डॉक्टर कारागृहात येतात. नाशिक येथील कारागृहात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांना नाशिकला हलवण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती अर्जात करण्यात आली होती.
त्यावर सुनावणी सुरू झाल्यावर असे किती आरोपी तुम्ही नाशिक येथे हलवले आहेत, अशी विचारणा न्यायालयाने ढोले यांना केली. असे आरोपी नाशिकला हलवताना तुम्ही कोणत्या न्यायालयाला विचारले होते? नुकतेच तुम्ही सानिया कादरी हिला नाशिक येथे हलवल्याचेही समोर आले आहे. त्या वेळी तुम्ही न्यायालयाची परवानगी घेतली होती का? घेतली असल्यास तसे परवानगीचे आदेश दाखवू शकाल का? असे प्रश्नही न्यायालयाने ढोले यांना विचारले. न्यायालयाच्या या प्रश्नांनी कारागृह अधीक्षक निरुत्तर झाले. न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक ठेवून कार्यभार उरकण्याचे प्रयत्न करू नका, अशी तंबीही न्यायालयाने ढोले यांना दिली. आपल्या पातळीवर काय निर्णय घ्यायचा तो घ्या, असे सांगत न्या. दीक्षित यांनी आरोपींच्या स्थलांतराचा अर्ज मागे घेणार आहात की त्यावर मी आदेश देऊ, अशी विचारणाही त्यांना केली. त्यावर ढोले यांनी दाखल केलेला अर्ज तत्काळ मागे घेतला.