स्त्री-भ्रूणहत्या: मानसिकतेत बदल करावा, स्मिता वाघ यांचे आवाहन

भुसावळ: मुलालाच वंशाचा दिवा समजले जाते. पूर्वापार चालत आलेला हा समज वैज्ञानिक युगातही कायम आहे. मुलीसुद्धा आता चूल आणि मुल यात अडकून न राहता घराबाहेर पडून पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. त्यामुळे घराची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होत आहे. पण या वस्तुस्थितीचा सकारात्मक विचार न करता मुलालाच अद्याप पसंती देत आहेत. आधुनिक काळातही भारतीय महिलांच्या मानसिकतेत बदल झालेला नाही. तो होणे नितांत गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा स्मिता वाघ यांनी येथे केले. शक्ती फाउंडेशनतर्फे ‘लेक वाचवा’ अभियानाचे उद्घाटन कोळी समाज कार्यालयात सोमवारी झाले. त्यात त्या बोलत होत्या.
अभियानाचे उद्घाटन खासदार हरिभाऊ जावळे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉ.उल्हास पाटील होते. आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष उमेश नेमाडे, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे, नगरसेविका भावना पाटील, विलास तायडे, चंद्रशेखर इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. शक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण जावळे, सचिव विजय जावळे, सुजय जावळे, मीराबाई जावळे, मिलिंद मुजुमदार, प्रा.सोपान बोराटे यांनी प्रमुख मान्यवरांचा सत्कार केला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.कमलताई पाटील यांनी केले. याच कार्यक्रमात कन्यारत्नाला प्राधान्य देणारे मंदार जोशी, ललित धांडे, अमोल टेंभुर्णीकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
विज्ञानाचा उपयोग चुकीच्या पद्धतीने केल्यास त्याचा परिणाम काय होतो, हे आता सर्वांच्या लक्षात येऊ लागले आहे. जिल्ह्यात मुलांच्या तुलनेत मुलींच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. परिणामी अनेक मुलांना लग्नासाठी मुली मिळणे अवघड झाले आहे. हे असेच चालू राहिल्यास भविष्यात खूपच बिकट परिस्थितीला तोंड द्यावे लागेल. तसे होऊ नये म्हणून फक्त शासनच नव्हे तर विविध संस्थांनीही स्त्री-भ्रूणहत्या थांबविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असा सूर उपस्थित मान्यवरांच्या मनोगतातून उमटला. भुसावळ येथील शक्ती आर्टिकल्सचे संचालक विजय जावळे यांनी स्त्री-भ्रूणहत्या रोखण्यासाठी हाती घेतलेले ‘लेक वाचवा’ जनजागृती अभियान दिशादायक असल्याचे गौरवोद्गार खासदार हरिभाऊ जावळे यांनी काढले. उद्घाटनानंतर मंदार जोशी यांचे लेक वाचवा या विषयावर कीर्तन झाले. शाहिरी पोवाडा व कीर्तनाच्या माध्यमातून मंदार जोशी यांनी लेक वाचवाचा गजर केला. पहाडी आवाजात सादर केलेल्या त्यांच्या या पोवाड्याला रसिक भाविकांनीही भरभरून दाद दिली.





