नाशिकः शिवसेना-भाजप-रिपाईने महायुती केली. परंतु, नाशिकमध्ये या महायुतीचे बिनसले आहे. अतर्गत वादामुळे नाशिक महापालिका निवडणुकीसाठी युतीची बोलणी फिस्कटली असून आता हे पक्ष आमनेसामने लढताना दिसणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात माहिती देतानाच निवडणुकीनंतर पुन्हा शिवसेनेशी हातमिळवणी करण्याचेही त्यांनी सांगितले.
शिवसेना आणि भाजपच्या युतीचा निर्णय स्थानिक पातळीवरच घेतला जाईल, अशी घोषणा भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांनी केली होती. त्यानंतर स्थानिक नेत्यांनी स्वतंत्र चूल मांडण्याचे प्रयत्न सुरू केले होते. शिवसेनेने दिलेल्या निमंत्रणालाही नाकारत त्यांनी मुलाखतींचा कार्यक्रम उरकून घेतला होता आणि युती तुटल्याची ‘ पुडी ’ ही सोडली होती. मात्र त्याचवेळी भाजपच्या एका गोटातून युतीसाठीही प्रयत्न सुरू होते. पण ते अखेर निष्फळ ठरलेत.
शिवसेनेच्या मागे फरफटत जाऊन भाजपने संघटनात्मक नुकसान करून घेऊ नये, असा सूर नाशकातल्या पदाधिका-यांनी लावला होता. युती तुटल्यानंतरही रिपाइं मात्र शिवसेनेबरोबर राहाणार आहे. महायुतीमध्ये पडलेल्या या भगदाडामुळे आघाडीला फायदा होण्याची शक्यता आहे. शिवसेनेतील बरेच कार्यकर्ते मनसेमध्ये प्रवेश करण्याचीही शक्यता आहे.