शेतीचे पाणी बंद, केवळ पिण्याच्या पाण्यालाच प्राधान्य : अजित पवार

पुणे - राज्यातील जलाशयांमधील पाणीसाठा 13 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. त्यामुळे सर्व शिल्लक पाणीसाठा पिण्यासाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतीसाठी पाणी उचलणा-या शेतीपंपांची वीजजोडणी खंडित करण्याचे आदेश ‘महावितरण’ला दिले आहेत, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
जूनची पावसाची सरासरी एकाही जिल्ह्यात गाठली गेलेली नाही. जळगाव जिल्ह्यात सरासरीच्या फक्त 13 टक्के इतका सर्वात कमी पाऊस आहे. बीड (1७ टक्के), औरंगाबाद (1९ टक्के), उस्मानाबाद (22 टक्के), नंदूरबार (21 टक्के), सोलापूर (43 टक्के), पुणे (24 टक्के) या जिल्ह्यांमधली पाऊस स्थिती गंभीर आहे. अकोला, अमरावती, यवतमाळ या मोजक्याच जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी गाठली. त्यामुळे पाणी टंचाईच्या सर्व उपाययोजना 15 जुलैपर्यंत सुरू ठेवल्या जातील, असे पवार म्हणाले.
पाऊस पडत नसल्याने धरणांमधील पाणीसाठा काटकसरीने वापरावा लागणार आहे. धरणांमधील पाणी सोडण्याचा निर्णय संबधित जिल्हाधिकारी किंवा विभागीय आयुक्तांच्या परवानगीशिवाय न घेण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला दिल्या आहेत. माणसांच्या आणि जनावरांसाठी पाणी राखून ठेवावे लागणार असल्याने शेतीचा पाणीपुरवठा थांबवण्यात आला आहे.
आषाढीला चंद्रभागेत पाणी - उजनी धरणाचा पाणीसाठा उणे 2६ टक्क्यांवर गेल्याने नगर, सोलापूर जिल्ह्यातील पाणीटंचाईचे संकट अधिक गहिरे झाले आहे. मात्र, तरीही आषाढी सोहळ्यासाठी येणा-या वारक-यांसाठी पंढरपूरच्या चंद्रभागेत पाणी सोडले जाईल. यासाठी नेहमीप्रमाणे पाणी आरक्षित ठेवण्यात आले आहे, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले.
कृत्रिम पाऊस नाहीच - पावसाने ओढ दिल्याने जून महिन्यात राज्यात सरासरीच्या फक्त 53 टक्के पाऊस झाला आहे. असे असले तरी राज्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार नाही. या प्रयोगाला येणा-या खर्चाच्या तुलनेत अपेक्षित पाऊस पडत नाही. त्यामुळे 2003 नंतर हा प्रयोग राज्यात राबवण्यात आला नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. पाणीटंचाईचा फटका जलविद्युत निर्मितीला बसलेला नसल्याचे त्यांनी नमूद केले.





