पत्रकारितेतील कॉन्ट्रॅक्ट सिस्टिमवर संशोधनाची गरज : काटजू

पुणे - पत्रकारितेतील करारपद्धत (कॉन्ट्रॅक्ट सिस्टिम) फारशी योग्य नाही. त्यातून जॉब सिक्युरिटीची भावना निर्माण होत नसल्याने पत्रकाराच्या मनात सतत टांगती तलवार राहते आणि तो मुक्तपणे पत्रकारिता करू शकत नाही. यासंदर्भात अधिक अभ्यास आणि संशोधनाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी बुधवारी येथे व्यक्त केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापात ते बोलत होते. प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या 28 सदस्यांची बैठक पुण्यात यशदा येथे सुरू झाली. यादरम्यान त्यांनी पुण्यातील माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
पत्रकारांशी केल्या जाणा-या करार पद्धतीवर टीका करत काटजू म्हणाले, या प्रकारामुळे पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर काही प्रमाणात मर्यादा येतात आणि नोकरीची हमी नसल्याने कायमच असुरक्षिततेची भावना त्यांना घेरून राहते. या संदर्भात वृत्तपत्रांच्या मालकांनी अधिक आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. पत्रकारांवरील हल्ल्यांविषयी चिंता व्यक्त करून काटजू म्हणाले, गेल्या पंधरा वर्षांत सुमारे 800 पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. यासंदर्भात महारा ष्ट्र ्राच्या मुख्यमंत्र्यांना सविस्तर पत्र दिले असून त्यांनी त्वरित कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे. यापुढे असे प्रकार रोखण्याचे प्रयत्न केले जातील.





