लाल किल्ल्यावरुन भाषण करण्याचे मायावतींचे स्वप्न

नागपूर - महाराष्ट्राचा उत्तर प्रदेशसारखा विकास व्हावा असे वाटत असेल तर राज्याची सत्ता बहुजन समाज पक्षाच्या हाती द्या, असे आवाहन पक्षाच्या नेत्या उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी रविवारी येथे केले.
बसप कार्यकर्त्यांच्या राज्यस्तरीय अधिवेशनानिमित्त नागपूरमध्ये आलेल्या मायावतींनी आपल्या मॅरेथॉन भाषणात दलित तसेच इतर जातींतील गरिबांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात सत्ता आली तर आपण जातीचे राजकारण करणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
इंदू मिलची जागा तसेच इतर काही आंदोलनात मिळालेले यश बसपमुळेच मिळाल्याचे त्या म्हणाल्या. दलितांचे शोषण करणा-यांना कठोर शासन करून त्यांच्यासाठी आयुष्य खर्ची घालणा-या नेत्यांची भव्य स्मारके राज्यात उभी केली जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.
केंद्र व राज्य सरकारच्या निष्क्रियेतेमुळे देशात गरिबी आणि बेरोजगारी वाढत चालली असल्याचे सांगून आदिवासींच्या जमिनी बळकावून श्रीमंतांच्या घशात घातल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. दलितांसाठी असलेल्या आरक्षणात आता इतर जाती घुसवल्या जात आहेत. याचा सर्वशक्तिनिशी विरोध करावा लागेल, असेही मायावती म्हणाल्या. अल्पसंख्यांक व उच्च जातींतील गरिबांना आर्थिक निकषावर आरक्षण देण्यास आपला पाठिंबाही त्यांनी जाहीर केला.
लाल किल्ल्यावरून भाषणाची इच्छा
आगामी लोकसभा निवडणुकीनंतर स्वातंत्र्यदिनी मला लाल किल्ल्यावरून भाषण करताना पहावयाचे असेल तर कार्यकर्त्यांनी बसपला मोठा विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
प्रमोशन कोट्यात काँग्रेस, भाजपचा अडसर
अनुसूचित जाती-जमातींच्या कर्मचा-यांना सरकारी नोकरीत पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याच्या आपल्या प्रयत्नांत काँग्रेस आणि भाजपनेच खोडा घातल्याचा आरोप मायावती यांनी केला. लाखो मागासवर्गीयांचा हक्क यामुळे हिरावला गेल्याचे त्या म्हणाल्या.






