सातारा - आपल्या म्हणण्याप्रमाणे लग्न करण्यास नकार देणा-या मुलीचा खून करणा-या आरोपी बापाच्या निषेधार्थ मंगळवारी साता-यातील महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढला. भटक्या विमुक्त जाती जमाती संघटनेचे नेते लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
औंध येथील या घटनेतील आरोपी शंकर बजरंग शिंदे याने आपली मुलगी आशा श्ािंदेच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून तिचा जीव घेतला तसेच स्वत: पोलिसात हजर होऊन या घटनेची माहिती दिली.
माणुसकीला काळिमा फासणा-या या घटनेचा निषेध करण्यासाठी मूकमोर्चा काढण्यात आला. माने म्हणाले की, स्त्रीस्वातंत्र्याचा, व्यक्तिस्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार घटनेने सर्वांना दिला आहे. या अधिकाराचा वापर एखादी व्यक्ती करत असेल तर त्यात गैर काही नाही. तरीही एक पिता स्वत:च्या मुलीची हत्या करतो, ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. कोणत्याही समाजातील आंतरजातीय विवाह करू इच्छिणा-या मुलामुलींना संरक्षण दिले पाहिजे, केवळ अहंकारासाठी मुलांना ठार मारणे योग्य नाही. वास्तविक आपण आता जातिधर्माच्या पलीकडे जाण्याची भूमिका घेतली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
कौटुंबिक हिंसा, अन्याय, अत्याचार या संदर्भात ठिकठिकाणी हेल्पलाइन सुरू करून मुली आणि स्त्रियांना संवाद साधता आला पाहिजे, आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणा-यांसाठी स्वतंत्र संरक्षण देणारा कायदा करण्यात यावा, बार असोसिएशनने अशा घटनेमध्ये आरोपींचे वकीलपत्र घेऊ नये आदी मागण्या या वेळी मोर्चेक-यांनी निवेदनाद्वारे केल्या.