मराठवाडा व विदर्भातील पालकमंत्री दुष्काळ निवारणाच्या निधीबाबम निरूत्साही : कदम

सांगली- दुष्काळ निवारणासाठी निधी वितरण करताना सरकारने कधीही पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ-मराठवाडा असा प्रादेशिक वाद केला नाही. टंचाईचे सर्व निर्णय सा-या राज्यासाठी असतात. मात्र बुलडाणा वगळता मराठवाडा व विदर्भातील एकाही जिल्ह्याच्या पालकमंत्र्याने सरकारकडे निधीची मागणीच केलेली नसल्याचा गौप्यस्फोट राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केला. ‘ मागणीच आली नाही तर निधी कसा देणार?’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
टंचाई निवारणाचा सर्वाधिक निधी पश्चिम महाराष्ट्रा वरच खर्च होत असल्याचा आरोप मराठवाडा व विदर्भातील काही मंत्र्यांनी केला होता. याबाबत पत्रकारांनी विचारले असता कदम म्हणाले की, बुलडाणा वगळता मराठवाडा आणि विदर्भातील एकाही जिल्ह्याने निधीची मागणी कळवलेली नाही. पालकमंत्र्यांनी टंचाई स्थितीचा आढावा घेवून निधीची मागणी आमच्याकडे करायला हवी; मात्र तसे घडत नाही. छावण्याच्या बाबतीत तर जिल्हाधिका-या नाच अधिकार दिले आहेत. त्यामुळे फक्त सांगली आणि साता-या त छावण्या सुरू झाल्या, याला शासन कसे जबाबदार?’ असा सवालही त्यांनी केला.
मुख्यमंत्री करणार मराठवाड्याचा दौरा
मराठवाड्यातील टंचाई स्थितीचा आढावा घेण्यासाठी येत्या आठवड्यात औरंगाबाद, उत्तर महाराष्ट्र आणि पुणे विभागीय आयुक्तांची बैठक मुंबईत बोलावली आहे. या बैठकीत एकूण टंचाई स्थितीचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह मी स्वत: मराठवाड्यातील टंचाई भागाचा दौरा करणार आहोत, असे पतंगराव कदम यांनी सांगितले.






