गर्दीचे रूपांतर कधी मतांत होत नसते ! - उपमुख्यमंत्री अजित पवार

सोलापूर- काही नेते राज्यात सभा घेत फिरत आहेत. मात्र, सभेला होणा-या गर्दीचे रूपांतर मतांमध्ये होत नाही, अशी टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता केली. त्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांचा हवालाही त्यांनी दिला.
एका कार्यक्रमासाठी पवार सोलापुरात आले होते. त्यावेळी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी चर्चा केली. राज्यात राजकीय पक्षांच्या नेत्यांचे दौरे वाढल्याविषयी विचारले असता ते म्हणाले की, प्रत्येक पक्षाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार असल्याचे ते म्हणाले.
मी लहान असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेसाठी असणारी गर्दी पाहायचो. गर्दी प्रचंड असायची. पण त्याचे मतांत रूपांतर होत नसायचे. 1995 मध्ये अपक्षांच्या मदतीने कसंबसं युतीचे सरकार आले. ते एकदाच. पुन्हा काही नाही, याची आठवणही पवार यांनी करून दिली.
उधळपट्टीचा विषय सोडा आता
राष्ट्र वादीचे नेते व नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला. राज्यात दुष्काळ पडलेला असताना एकीकडे राष्ट्र वादीचे मंत्री पैसे उडवण्यात मशगूल आहेत. हा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर पवार म्हणाले की, किती दिवस तुम्ही हाच विषय धरून बसणार? सोडा की आता. राष्ट्र वादीचे सर्वोच्च नेते केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर मी अधिक बोलणार नाही.






