भरतपूर/दिल्ली/भोपाळ - पाकिस्तानी सैनिकांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या लान्स नायक हेमराजचे पार्थिव उत्तर प्रदेशातील त्याच्या मूळ गावी आणण्यात आले आणि मातेच्या भावनेचा बांध फुटला. शिर नसलेले हे पार्थिव पाहून दु:खावेग अनावर झालेल्या आईने अधिका-याकडे पाहत ‘मला माझ्या मुलाचे शिर हवे आहे..., असा टाहो फोडला.
हेमराजचे पार्थिव अधिका-यानी चितेवर ठेवण्यासाठी उचलले तेव्हा ग्रामस्थांनी अडवले. अगोदर जवानाचे शिर आणा तेव्हाच अंत्यसंस्कार होतील, अशी भूमिका त्यांनी घेतली. उशिरापर्यंत शहिदाची माता आणि ग्रामस्थांची समजून काढण्यात आली. शेवटी 8.55 वाजता अंत्यसंस्कार झाले.
देशभर रोष : हल्ल्यात पाक सैनिकांच्या सहभागाचे पुरावे मिळाल्याचा दावा केंद्र सरकारने केला. हल्ल्यातील एका शहिदाचे शिर तोडून पाक सैनिकांनी नेले होते. यामुळे देशभर रोष असून, संतापाची लाट आहे. पाकला चोख प्रत्युत्तर देण्याची मागणी होत आहे.
परराष्ट्र सचिव रंजन मथाई यांनी पाकिस्तानी उच्चायुक्त सलमान बशीर यांना बोलावून तीव्र आक्षेप नोंदवला. दोन्ही देशांत संबंध सुधारण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना त्यामुळे खीळ बसू शकते, असा इशाराही दिला. काँग्रेस, भाजपसह इतर सर्वच राजकीय पक्षांनी तीव्र निषेध करत पाकला सडेतोड उत्तर देण्याची मागणी केली. पाकसोबतचे राजकीय तसेच व्यापारी संबंध तोडण्याची मागणी जोर धरत असून सरकारवर दबाव वाढत चालला आहे.
शहीद जवानाच्या गावात ‘पाकिस्तान मुर्दाबाद’चे नारे
राजस्थानच्या सीमेपासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर शेरनगर भागात लान्स नायक हेमराजचे पार्थिव येताच पाकिस्तानच्या विरोध ग्रामस्थांचा रोष उफाळून आला. ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ अशी जोरदार नारेबाजी करत ग्रामस्थांनी आपल्या लाडक्या नायकाबद्दल भावना व्यक्त केल्या. दरम्यान, सुधाकरसिंग याच्यावर मध्य प्रदेशातील डढिया या मूळ गावी गुरुवारी अंत्यसंस्कार होतील.