काँग्रेसची 25 % मते फुटतील : सुब्रह्मण्यम स्वामी

भोपाळ - राष्ट्रपतिपदासाठीच्या निवडणुकीचे चित्र आगामी काळात बदलेल. मतदानाची तारीख जवळ येईपर्यंत काँग्रेसची 20 ते 25 टक्के मते फुटतील आणि एनडीएचे उमेदवार पी. ए. संगमा राष्ट्रपती बनतील, असा दावा जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केला आहे. आणीबाणीच्या वार्षिक स्मृतीनिमित्त येथे आयोजित कार्यक्रमात स्वामी बोलत होते. आतापर्यंत देशात एकही ख्रिश्चन व्यक्ती राष्ट्रपती बनलेली नाही. राष्ट्रपतिपदासाठी संगमा हेच योग्य उमेदवार आहेत. 15 जुलैपर्यंत मुखर्जींबाबत इतक्या भानगडी समोर येतील की, आज त्यांचे समर्थन करणारे अनेक पक्ष संगमांच्या बाजूने उभे ठाकतील, असा दावा स्वामींनी केला. विदेशात जमा असलेला काळा पैसा देशात परत आणण्यासाठी अर्थमंत्री असताना मुखर्जींनी काहीच प्रयत्न केले नाहीत. तसेच टू जी स्पेक्ट्रम प्रकरणातही त्यांची भूमिका संदिग्ध आहे, असा आरोप स्वामींनी केला.





