आरोपींना फाशीच हवी, माफीचे साक्षीदार बनवू नकाः पीडितेच्या कुटुंबियांची मागणी

नवी दिल्ली- दिल्ली गँगरेपप्रकरणातील 2 आरोपींनी माफीचा साक्षीदार होण्याची विनंती केल्यानंतर पीडित मुलीचे कुटुंबिय संतापले आहेत. हा प्रकार म्हणजे फाशीच्या शिक्षेपासून सुटका मिळण्यासाठी रचलेला बनाव असल्याचे सांगून. आरोपींची याचिका फेटाळण्यात यावी, अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे.
पीडित मुलीच्या वडिलांनी यासंदर्भात तीव्र प्रतिक्रीया नोंदविताना सांगितले की, याप्रकरणी पोलिसांकडे सक्षम पुरावे आहेत. प्रबळ साक्षीदार आहेत. त्यामुळे आरोपींना माफीचा साक्षीदार बनवून मदत घेण्याची काहीही गरज नाही. तर आरोपींनी निर्दयीपणे अतिशय घृणास्पद गुन्हा केला आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची सवलत न देता फाशीच दिली पाहिजे, असे पीडितेचे काका आणि आजोबांनी म्हटले आहे.
पवन गुप्ता आणि विनय शर्मा यांनी काल माफीचा साक्षीदार होण्यासंबंधी अर्ज दिला होता. कायदेतज्ञांच्या मते अशा प्रकरणात आरोपींनी माफीचा साक्षीदार होऊन शिक्षेपासून वाचण्यासाची अपेक्षा करु नये. ठोस पुरावे नसतात किंवा तपास यंत्रणांना मदत लागते, त्यावेळी काही आरोपींना माफीचा साक्षीदार बनविले जाते. परंतु, याप्रकरणात सक्षम पुरावे आहेत.






