पाकिस्तानला दिलेला मैत्रीचा हात हा दुबळेपणा नव्हे : प्रणव मुखर्जी

नवी दिल्ली - आम्ही मैत्रीचा हात पुढे केला, तो आमचा दुबळेपणा समजू नका. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद कदापिही खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड दम राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पाकिस्तानला भरला. आर्थिक धोरणांचे फायदे गाव, शाळा आणि रुग्णालयांमध्येही दिसलेच पाहिजेत, असा आग्रहही राष्ट्रपतींनी धरला आहे.
64 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशात मुखर्जी यांनी जम्मू-काश्मिरात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने केलेल्या युद्धबंदीचा उल्लेख केला. एका भारतीय जवानाचे शिर कापून नेण्याची पाकिस्तानची कृती नृशंस असल्याचे सांगत मुखर्जी म्हणाले की, शेजा-या ंशी मतभेद असू शकतात, सीमेवर तणावही असू शकतो. मात्र, दहशतवाद्यांच्या माध्यमातून हिंसाचाराला खतपाणी घालणे ही गंभीर बाब आहे. भारताला सीमेवर शांतता हवी आहे. त्यामुळेच आम्ही नेहमी मैत्रीचा हात पुढे करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, आमचा हा पुढाकार म्हणजे आमचे दुबळेपण आहे, असे कुणीही समजू नये, आर्थिक सुधारणांची अंमलबजावणी करताना खबरदारी घेण्याचा इशारा केंद्र सरकारला दिला आहे.
*‘ती मुलगी’ आकांक्षांचे प्रतीक
राष्ट्रपती म्हणाले, एका दुर्घटनेने आम्हाला हेलावून टाकलेले असताना अशा परिस्थितीत मी राष्ट्राला संबोधित करत आहे. एका मुलीसोबत नृशंस दुष्कृत्य झाले. तिची हत्या करण्यात आली. ती उदयोन्मुख भारताच्या आकांक्षांचे प्रतीक होती. आम्ही एका जिवापेक्षाही एक स्वप्न गमावले आहे.
*तरुणांच्या शंकांचे निरसन
आम्ही दुस-या पिढीच्या बदलाच्या उंबरठ्यावर आहोत. तरुणांच्या मनात आज अनेक शंकांनी घर केले आहे. तांत्रिक कौशल्याला समान संधी मिळते का? या आणि अन्य शंकांचे निरसन झालेच पाहिजे.
*उपाशीपोटी स्वप्न नाही
राष्ट्रपती म्हणाले, युवा उपाशीपोटी स्वप्न पाहू शकत नाही. त्याला त्याच्या आणि राष्ट्राच्या महत्त्वाकांक्षाची पूर्तता करण्यासाठी रोजगार हवा आहे. आर्थिक विकासाचा लाभ ही भाग्यशाली लोकांचीच मक्तेदारी नको.






