हैदराबाद/मुंबई - हैदराबादेत दिलसुखनगरात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांतील आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी तपास पथकांना पक्के धागेदोरे मिळाले आहेत. स्फोट झाले तेव्हा अनेक सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून होते. त्यातून मिळालेली माहिती आरोपींचा छडा लावण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. पोलिसांना पहिला संशय ‘इंडियन मुजाहिदीन’वर असून ‘एनआयए’ने (केंद्रीय तपास संस्था) तिहार तुरुंगात असलेला अतिरेकी मकबूल याचीही कसून चौकशी केली. दरम्यान, या स्फोटांच्या तपासासाठी 15 पथके स्थापन करण्यात आली आहेत.
गुरुवारी झालेल्या दोन स्फोटांत 16 जण ठार तर 117 जण जखमी झाले होते. पोलिस आयुक्त अनुराग शर्मा म्हणाले, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. काही लोकांची चौकशी करण्यात आली. दरम्यान, स्फोट झाले तेव्हा दिलसुखनगरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे सुरू होते, असे मिळालेल्या फुटेजवरून स्पष्ट झाले आहे.
केंद्राच्या इशार्यानंतर हैदराबादेत बंदोबस्त वाढवला होता. पोलिसांची करडी नजर होती. बॉम्बरोधक पथके जागोजाग तपासणी करत होती, असेही शर्मा यांनी म्हटले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक जण सायकलवर पिशवीत काहीतरी घेऊन आल्याचे दिसत असून परतताना मात्र तो पायी जाताना दिसत आहे. याचा छडा लावला जात आहे.