सचिन, सौरवला 'भारतरत्न' देऊ नयेः न्या. काटजू

कोलकता - क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांना 'भारतरत्न' पुरस्कार द्यायला नको, अशी स्पष्ट भूमिका प्रेस काउन्सिलचे अध्यक्ष न्या. मार्कंडेय काटजू यांनी मांडली आहे. क्रिकेटपटू आणि चित्रपट अभिनेत्यांमुळे सांस्कृतिक पातळी खालावत आहे, असे काटजू म्हणाले.
कोलकाता येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, सचिन आणि गांगुलीला 'भारतरत्न' देण्याची मागणी होत आहे. कधी कधी अभिनेत्यांसाठीही अशी मागणी होते. पण अशाने देशातील संस्कृतीची खालावलेली पातळीच दिसून येते. क्रिकेटपटू आणि अभिनेत्यांना हा पुरस्कार कदापि देऊ नये, असे काटजू म्हणाले. महिला, गरीब आणि मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी काम केलेल्या काझी नझरूल इस्लाम यांच्यासारख्या कवीला "भारतरत्न' मिळावे, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच मुन्शी प्रेमचंद यांच्यासारखे कवीही मरणोपरांत या पुरस्काराचे दावेदार असल्याचे त्यांनी सांगितले.






