प्रणव मुखर्जी भडकले; सोनियांनी समजूत काढली

नवी दिल्ली - एअरसेल-मॅक्सिस करारात गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी कथितरीत्या लाभ घेतल्याच्या आरोपावरून गुरुवारी संसदेत प्रचंड गदारोळ झाला. हा महाघोटाळा असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. प्रचंड गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज तीन वेळा तर राज्यसभेचे कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले.
भाजपचे यशवंत सिन्हा यांनी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केला. चिदंबरम यांचे नाव न घेता त्यांनी एअरसेल-मॅक्सिस करारात घोटाळा असल्याचा आरोप केला. तत्कालीन अर्थमंत्र्यांचा मुलगा कार्ती यात सहभागी असल्याचे सांगून त्याला मलेशियास्थित मॅक्सिस कंपनीचे 5 टक्के समभाग मिळाले होते, असे सिन्हा म्हणाले. या नंतरच्या काळात 2006 मध्ये अर्थमंत्रीपदी असताना चिदंबरम यांनीच मॅक्सिस कंपनीला एअरसेलमध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी दिली होती. मॅक्सिस कंपनीने एअरसेलचे 99.3 टक्के समभाग खरेदी केले. प्रत्यक्षात कोणतीही विदेशी कंपनी नियमानुसार स्थानिक कंपनीचे 74 टक्के समभागच खरेदी करू शकते. प्रथमदर्शनी हा महाघोटाळा असल्याचे सांगत अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी खुलासा करावा, अशी मागणी सिन्हा यांनी केली. सिन्हा हे आरोप करत असताना चिदंबरम सभागृहात नव्हते. भाजप-अण्णाद्रमुकच्या खासदारांनी चिदंबरम यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. दरम्यान, राज्यसभेतही भाजप नेते अरुण जेटली आणि व्यंकय्या नायडू यांनी सरकारला घेरले. भाजपला या सभागृहात शिवसेना, अण्णाद्रमुक आणि डाव्या पक्षाच्या सदस्यांनी पाठिंबा दिला.
प्रणवदा भडकले! - सिन्हा यांनी गंभीर आरोप केल्यानंतर अर्थमंत्री प्रणव मुखर्जी सभागृहातच भडकले. मोठय़ा आवाजात ते म्हणाले, ‘सभागृहात कामकाज होऊच नये, अशी विरोधी पक्षांची इच्छा आहे. म्हणूनच वारंवार एकच मुद्दा उपस्थित केला जात आहे.’ प्रणवदा भडकल्याचे लक्षात येताच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांना शांत केले.
खुलासा वाचून दाखवला
या मुद्दय़ावर चिदंबरम यांचा मुलगा कार्ती यानेही खुलासा केला आहे. तो गृहमंत्र्यांनी वाचून दाखवला. कार्ती म्हणतो, एअरसेल किंवा मॅक्सिसमध्ये माझे किंवा माझ्या कुटुंबातील एकाही सदस्याचे समभाग नाहीत. संसदेचा वापर एका सामान्य माणसावर आरोप करण्यासाठी केला जात आहे हे दुर्दैवी आहे.
खुलाशाला का घाबरता? - विरोधी पक्षांनी कोणतीही सूचना न देता हा मुद्दा अचानक उपस्थित केला. यावर चिदंबरम म्हणाले, या मुद्दय़ावर खुलासा ऐकून घेण्यास विरोधक घाबरतात कशामुळे? माझी प्रार्थना आहे, देव त्यांच्या चुका माफ करो. तत्पूर्वी विरोधकांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे ते म्हणाले.





