नवी दिल्ली- पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधी मोडली असून जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषा पार करुन पाकिस्तानी सैनिकांनी 2 भारतीय सैनिकांची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यांचा शिरच्छेद करण्यात आला असून पाकिस्तानी सैनिक मृत भारतीय सैनिकांचे शिर घेऊन गेल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.
प्राप्त माहितीनुसार, नियंत्रण रेषेवर गस्त घालणा-या भारतीय पथकावर पाकिस्तानी सैनिकांनी बेछूट गोळीबार केला. पाकिस्तानी सैनिका भारतीय हद्दी 100 ते 200 मीटरपर्यंत आत घुसले होते. त्यांनी लान्सनायक सुधाकर सिंग आणि हेमराज यांची हत्या केली. तसेच त्यांचे शिर कापले आणि एकाचे शिर सोबत नेले. भारतीय सैन्याने दोन सैनिकांची हत्या करण्यात आल्याच वृत्ताला दुजोरा दिला. परंतु, शिरच्छेदावर प्रतिक्रीया दिली नाही. पाकिस्तानकडून गेल्या काही दिवसांपासून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असून मंगळवारचा गोळीबार हा देखील या शस्त्रसंधी भंगाचा प्रकार आहे. शहीद झालेल्या भारतीय जवानांकडील शस्त्रास्त्रेही पाकिस्तानी सैनिकांनी पळवून नेल्याचे वृत्त आहे. या गोळीबारात 2 भारतीय जवान जखमी झाल्याचे कळते.