नवी दिल्ली - मेंढर येथे पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या कृत्याच्या विरोधात भारतीय सैन्य आणि सामान्य भारतीयांमध्ये प्रचंड रोष आहे. सैनिक मात्र संयम ठेवत वरिष्ठांच्या आदेशाची वाट पाहात आहेत. बीएसएफचे जवान अलर्ट आहेत. भारताने पाकिस्तानी उच्चायुक्तांना घटनेची माहिती दिली असून, संरक्षणमंत्री ए. के. एंटोनी भडकले आहेत. त्यांनी पाकिस्तानी सैन्याची कृती चिथावणीखोर असून ज्या पद्धतीने जवानांची हत्या करण्यात आली, तो प्रकार अमानुष आहे, असे म्हटले आहे.
तज्ज्ञांनी भारत सरकारची भूमिका योग्य असल्याचे म्हणत, कठोर कारवाईची आवश्यकता व्यक्त केली आहे. ले. जनरल (निवृत्त) शंकर प्रसाद म्हणाले, युद्धबंदीच्या काळात एवढी मोठी घटना होणे योग्य नाही. पाकिस्तानने याबद्दल माफी मागितली पाहिजे. या विरोधात आपण इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टीस, आंतरराष्ट्रीय युद्ध गुन्ह्यांविरोधातील समिती, मानवाधिकार आयोग, युनो सह अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांकडे दाद मागू शकतो.
भारताचे पाकिस्तान मधील उच्चायुक्त राहिलेले जी. पार्थसारथी म्हणाले, अमेरिकेने दोन्ही देशांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे अशावेळेस आंतरराष्ट्रीय पातळीवर या प्रकरणाचा योग्य निर्णय लागण्याची आशा नाही. आंतरराष्ट्रीय युद्ध गुन्हांची समिती जेव्हा तयार करण्यात आली तेव्हा भारत त्यात सहभागी झाला नाही. त्यामुळे तिथेही न्याय मिळण्याची आशा कमीच आहे. दुसरीकडे पाकिस्ताननेही भारताने त्यांच्या सैनिकांची हत्या केल्याचे म्हणत आहेत. वास्तविक भारताने हा आरोप फेटाळून लावला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर हा मुदा उपस्थित केल्याने तो निकाली निघेल असे वाटत नाही. ते म्हणाले, योग्यवेळी भारताने ठोस उत्तर दिले पाहिजे. तेही कोणतीही घोषणा न करता. मात्र, भारत असे कधी करणार नाही. असेही ते म्हणाले.
निवृत्त जनरल शंकर रॉय चौधरी म्हणाले, पाकिस्तानने केलेले हे कृत्य काही पाहिले नाही. इतिहासात डोकावल्यास अशी अनेक उदाहरणे सापडतील. १९७१ मध्ये पाकिस्तानने भारतीय सैनिकांचे डोळे काढून घेतले होते. असे अमानवीय कृती त्यांच्याकडून वारंवार घडत असते. आपण मात्र, केवळ बोलत राहातो. असे व्हायला नको. यापुढे असे होणार नाही, हे हस्यास्पद आहे.
सी. उदय भास्कर म्हणाले, कारगील नंतरची ही सर्वात मोठी सैन्य कारवाई आहे. २००९ मध्ये २८, २०१० मध्ये ४४ आणि २०११ मध्ये ५१ वेळा युद्धबंदीचा भंग पाकिस्तानने केला आहे.