नवी दिल्ली - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मानसिक संतूलन बिघडले असल्याची टीका बिहारच्या मंत्र्यांनी केली आहे.
शनिवारी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात राज यांनी दिल्लीत झालेल्या गँगरेप प्रकरणातील आरोपी बिहारी असल्याकडे लक्ष वेधले. तसेच दिल्लीतील बजबजपुरीला परप्रांतियच कारणीभूत असल्याचे मुख्यमंत्री शीला दीक्षितही सांगत असल्याचे ते म्हणाले. राज यांनी पुन्हा एकदा परप्रांतियांवर शरसंधान केल्यानंतर उत्तरेतील नेत्यांनी त्यांच्यावर टीका सुरु केली आहे.
जनता दल (यु)चे नेते आणि बिहारचे मंत्री गिरीराज सिंह म्हणाले, अशा प्रकारचे वक्तव्य करणा-यांचे मानसिक संतुलन बिघडेल असले पाहिजे. मनसे पक्षावर बंदी घालण्याचीही मागणी त्यांनी केली.
दिल्लीची घटना दुर्दैवी असून त्यानंतर देशाला भारत आणि इंडिया किंवा बिहार आणि महाराष्ट्रामध्ये विभक्त करणे चुक आहे. यामुळे भारताच्या एकतेवर परिणाम होतो. तसेच लोकशाही देखील कमकुवत होते, असे काँग्रेसचे नेते राशिद अल्वी म्हणाले.