स्वामी विवेकानंदांना 39 वर्षात 31 व्याधी

कोलकाता - भारतीय अध्यात्माचा जगभरात प्रसार करणारे स्वामी विवेकानंद यांना आयुष्य जेमतेम 39 वर्षेच लाभले होते. आरोग्याच्या पातळीवर त्यांचे अल्पायु अनेक आजारांचे घर बनले होते. त्यांना वयाच्या 39 व्या वर्षी 31 आजार होते.
‘द माँक अॅज मॅन ’ चे प्रसिद्ध बंगाली लेखक शंकर यांनी विवेकानंद यांच्या आजाराची यादी मांडली आहे. ‘शरीरं व्याधीमंदीरम ’अशा संस्कृत शब्दांत शंकर यांनी त्यांच्या व्याधीग्रस्त शरीराचे वर्णन केले आहे. अनिद्रा, यकृत, किडनीतील बिघाड, मलेरिया, मायग्रेन, मधुमेह यासह ह्रदयासंबंधी विकारांनाही ते तोंड देत होते, असा दावा शंकर यांनी केला आहे.
विवेकानंदांना अनिद्रेचा प्रचंड त्रास होता. त्यांनी स्वत:च आपल्या प्रकृतीची तक्रार केली होती. शशी भूषण घोष यांना 29 मे 1897 मध्ये लिहिलेल्या पत्रात त्यांनी याचा उल्लेख केला होता. त्या अगोदर त्यांनी त्याची तीव्रताही व्यक्त केली होती. विवेकानंदांच्या वडीलांना मधुमेह होता. त्यांनाही तो झाला होता. परंतु त्याकाळी मधुमेहाच्या गोळ्या सहजपणे उपलब्ध होत नसत. 1887 मध्ये त्यांना पोटाचा तीव्र त्रास झाला होता. चिंतेमधून त्यांना हा त्रास जाणवला होता, असे शंकर यांनी म्हटले आहे. शंकर यांनी विवेकानंद यांच्या आजाराची सविस्तर माहिती मांडली आहे.इजिप्तमध्ये असताना विवेकानंद यांनी आपला इहलोकीचा प्रवास 4 जुलै रोजी संपणार असल्याचे अगोदरच स्पष्ट केले होते. आता मला भारतात परतले पाहिजे. गुरूबंधुंच्या सहवासात जाऊन तेथेच देह सोडणार आहे, असे सांगतांना त्यांचे डोळे डबडबलेले होते. त्यांची वाणी 1902 मध्ये सांगितलेल्या तारखेला खरी ठरली . त्यांना 39 वर्षे पाच महिने आणि 24 दिवस एवढे आयुष्य लाभले.
सर्व उपचारांचा अवलंब - अनेक आजारांमुळे त्रस्त असलेल्या विवेकानंद यांनी अॅलोपॅथी, होमिओपॅथी आणि आयुर्वेदाच उपचार घेतले. वेगवेगळ्या देशातील आरोग्य तज्ज्ञांकडूनही त्यांनी प्रकृतीविषयी सल्ला घेतले होते, असे शंकर यांनी म्हटले आहे.





