मुंबई- मुंबईत रविवारी झालेल्या पंजाब किंग्स इलेव्हन आणि मुंबई इंडियन्स या सामन्यात पंजाबने सहा गडी राखून दणदणीत विजय मिळविला. पंजाबचा या हंगामातील तिसरा विजय ठरला. या स्पर्धेत आतापर्यंत पंजाबची कामगिरी खराबच राहिली आहे.
काल झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या मुनाफ पटेल मैदानात पुन्हा एकदा वाद घातला. मागील सामन्यातही मुनाफने पंचाशी वाद घातला होता. आता पुन्हा एकदा त्याने वाद घातल्याने त्याच्यावर काय कारवाई होते का ते पाहायचे आहे. मागील चार दिवसापूर्वी पंजाब संघाची सहमालकीण प्रीती झिंटानेही मैदानात जात पंचाशी वाद घातला होता. ते प्रकरण चांगलेच गाजले होते. त्याबाबतचा अहवाल आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी सामनाधिका-याकडे मागवला आहे.
आयपीएल स्पर्धा ही क्लब क्रिकेटचा प्रकार आहे. असे असले तरी क्रिकेटची तत्वे सोडून पंचाशी वाद घालणे हे अयोग्यच ठरेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमानुसार मुनाफला चार-पाच सामन्यांसाठी बंदी घातली गेली असती. मात्र आयपीएलमध्ये याबाबतचे नियम अजून तरी स्पष्ट असल्याचे दिसून येत नाही.
कालच्या सामन्यात पंजाबच्या शॉन मार्शने मुंबई गोलंदाजांची धुलाई केली. त्याने केवळ ४० चेंडूत पाच चौकार आणि तीन षटकाराच्या मदतीने नाबाद ६८ धावा ठोकत संघाला कठीण परिस्थितीत विजय मिळवून दिला. मुंबईने पंजाबला १६४ धावांचे आव्हान दिले होते. मात्र खराब सुरुवातीनंतर मार्शने तुफान फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सामना हातातून जात असल्याचे लक्षात येताच मार्शकडून सपाटून मार खात असलेल्या मुनाफचा पारा चढला व तो राग त्याने पंचावर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा ना मुंबई इंडियन्सला फायदा ना मुनाफ पटेलला. कारण पंजाबने हा सामना सहा गड्यांनी जिंकला.