भारत -ऑस्ट्रेलिया दुसरी कसोटी हैदराबादमध्येच- बीसीसीआयचे स्पष्टीकरण

चेन्नई- हैदराबादमध्ये काल सायंकाळी दोन शक्तिशाली बॉम्बस्फोट झाल्यानंतर 2 मार्चपासून तेथे खेळविण्यात येणारा भारत आणि आस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामना सुरळित होईल, अशी आशा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हैदराबादमध्ये कसोटी क्रिकेट सामना खेळण्यास ऑस्ट्रेलिया तयार होईल का असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने स्पष्टीकरण दिले आहे. आमची व आमच्या खेळाडूची बीसीसीआय पुरेशी काळजी घेईल, असा विश्वास आहे. त्यामुळे तेथील सामना सुरळित होईल, असा विश्वास असल्याचे ऑस्ट्रेलियाचे जेम्स सदरलॅंड यांनी म्हटले आहे. मात्र, खेळाडूंच्या मनात भीती असून, सरावाच्या काळात खेळाडू मानसिकदृष्ट्या फिट असतील का पाहावे लागेल. दरम्यान, बीसीसीआयने दुसरा कसोटी सामना हैदराबादमध्येच होईल, असे सांगत या विषयाला पूर्णविराम दिला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 2 ते 6 मार्च या काळात डेक्कनच्या खेळपट्टीवर कसोटी सामना होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना आजपासून चेन्नईतील चेपॅकच्या खेळपट्टीवर सुरु होत आहे.






