चेन्नई- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीने दमदार अर्धशतके ठोकून ऑस्ट्रेलियाला दमदार प्रत्युत्तर दिले. दुस-या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी भारताने 3 बाद 182 धावांपर्यंत मजल मारली. भारत ऑस्ट्रेलियाच्या 198 धावांनी पिछाडीवर आहे. सचिन तेंडुलकर 71 तर विराट कोहली 50 धावांवर नाबाद होते.
वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिंसनने भारताची सलामीची जोडी अवघ्या 12 धावांमध्ये तंबूत धाडली. त्यानंतर सचिन तेंडुलकर आणि चेतेश्वर पुजाराने 93 धावांची दमदार भागीदारी करुन डाव सावरला. परंतु, जेम्स पॅटिंसनने भारताला तिसरा धक्का दिला. चेतेश्वर पुजाराचा त्याने 44 धावांवर त्रिफळा उडविला. चहापानानंतर क्लार्कने पॅटिंसनला गोलंदाजीसाठी आणले. हा बदल ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वाचा ठरला. पॅटिंसनच्या खाली राहिलेल्या इनकटरवर पुजारा फसला आणि त्रिफळा उडाला. त्यानंतर कोहलीच्या साथीने सचिनने डाव सावरला. दोघांनी दिवसअखेरपर्यंत नाबाद 77 धावांची भागीदारी केली. त्यात विराट कोहलीचा वाटा आहे 50 धावांचा. विराट कोहली सुरुवातीला काहीसा दबावात खेळला. परंतु, स्थिरावल्यानंतर त्याने अप्रतिम फटकेबाजी केली. त्याने 7 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले.