टीम इंडियामध्ये दुफळी, पराभवानंतर कर्णधार-कोचचे मौन

कोलकात्यामध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध दुसरा वन डे सामना गमाविल्यानंतर टीम इंडियावर देशभरातून टीकेचा भडीमार सुरु झाला. गेल्या दिड वर्षांपासून टीम इंडिया पराभवाच्या गर्तेत अडकली आहे. याची अनेक कारणे आहेत. परंतु, महत्त्वाचे कारण म्हणजे संघात एकीचा अभाव दिसून येत आहे. संघात गटबाजी आणि दुफळी निर्माण झाली आहे. दिल्लीकर आणि धोनीचा गट एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. याचा परिणाम मैदानावरील कामगिरीवर होत आहे.
कोलकाता वन डेसोबतच लाजीरवाणा मालिका पराभव स्विकारल्यानंतर ही दुफळी ड्रेसिंग रुममध्ये दिसून आल्याचे सुत्रांनी सांगितले. कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि कोच डंकन फ्लेचरने सामन्यानंतर आपसांत संवाद साधला नाही. दोघांनी संघातील खेळाडुंसोबतही चर्चा केली नाही. धोनी तर स्टेडियममधुन हॉटेलपर्यंत जाताना संघाच्या बसमध्ये दिसला नाही. इतर खेळाडुदेखील आपसांत बोलताना दिसले नाही.






