नवी दिल्ली- भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी झालेल्या तिस-या एकदिवसीय सामन्यात भारताने पाकिस्तानवर १० धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. असे असले तरी या विजयानंतर अनेकांच्या भवया उंचावल्या आहेत तसेच काहींनी काही प्रश्न या विजयाबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. इंग्लंडचा माजी क्रिकेटर आणि यष्टीरक्षक पॉल निक्सनने शंका उपस्थित केली आहे की, कोटलावर खेळवली गेलेली मॅच 'फिक्स' असू शकते.
आंतरराष्ट्रीय स्तरावर इंग्लंडसाठी 19 वनडे आणि एक टी-20 सामना खेळलेले निक्सन यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानने ही मालिका यापूर्वीच जिंकली आहे. त्यामुळे शेवटचा सामना हारण्यास त्यांना काहीच धोका नव्हता.
दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी पहिल्या तीन सामन्यासाठी निवडलेल्या संघाबाबतही प्रश्न उठविण्यात आले आहेत. या मालिकेसाठी भारताचा सलामीवीर वीरेंद्र सेहवागला संघातून डच्चू देण्यात आला आहे. तर त्याच्या जागेवर चेतेश्वर पुजाराला संधी देण्यात आली आहे. भारतीय निवड समितीने खराब कामगिरीमुळे सेहवागला वगळले असले तरी त्याच्यापेक्षा खराब कामगिरी करणा-या गौतम गंभीर आणि रोहित शर्मा यांना संधी दिली आहे. सेहवागने पाकिस्तानविरुद्धच्या मागील दोन सामन्यात ३५ धावा केल्या आहेत. तर, रोहित शर्माने मागील पाच सामन्यात केवळ १२ धावा केल्या आहेत. गंभीरने तीन सामन्यात ३१ धावा केल्या आहेत. तरीही या दोघांना संघात ठेवले आहे तर, सेहवागला वगळले आहे. याबाबत सांगितले जात आहे की, सेहवागचे वन डे क्रिकेटमधील करिअर संपल्यात जमा आहे. त्यातच त्याचे वय ३४ वर्षे आहे. त्याच्या पायाच्या हालचाली मंदावल्या आहेत. त्यामुळेच तो सतत पायचित किंवा त्रिफळाचित होत आहे. माजी कसोटीपटू मनोज प्रभाकरने म्हटले आहे की, सेहवागचे एकदिवसीय करिअर जवळ-जवळ संपल्यातच जमा आहे.