इराणी करंडक पुन्हा शेष भारत संघाकडे

मुंबई- पहिल्या डावातील 117 धावांच्या आघाडीच्या जोरावर शेष भारत संघाने हरभजन सिंगच्या नेतृत्वाखाली इराणी करंडक पुन्हा आपल्याकडेच कायम ठेवण्यात यश मिळवले. सलामीवीर वसीम जाफरचे प्रथमश्रेणी क्रिकेटमधील 48 वे शतकही मुंबईला विजय मिळवून देऊ शकले नाही.
शेष भारताचे इराणी चषकाच्या 51व्या वर्षातील हे 26 वे जेतेपद ठरले. शेष भारत संघाने शनिवारी दुस-या डावात चार विकेटच्या बदल्यात 296 धावांबरोबर 413 धावांची आघाडी घेतली होती. तेव्हाच त्यांनी विजेतेपद आपल्या नावे केले होते. आजच्या दिवशी सकाळच्या सत्रात ही आघाडी 506 धावांपर्यंत नेऊन पाच विकेटच्या बदल्यात 389 धावांवर डाव घोषित केला. अंबाती रायडूने 12 चौकार आणि चार षटकारांच्या साहाय्याने नाबाद 156 धावा बनवल्या.
मुंबईने आपल्या दुस-या डावात चार विकेटच्या बदल्यात 160 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या आगामी कसोटी मालिकेत संघात स्थान मिळवण्यास अपयशी ठरलेल्या जाफरने नाबाद 101 धावा बनवल्या. मागच्यावर्षी शेष भारत संघाने बेंगळूरू येथे झालेल्या सामन्यात राजस्थानचा एक डाव आणि 79 धावांनी पराभव केला होता.






