इंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी वीरू, गंभीरच्या निवडीवर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली- अनुभवी फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांच्या सलग अपयशामुळे इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेत त्यांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांतील सलगच्या पराभवामुळे सुमार कामगिरी करणा-या खेळाडूंना संघाबाहेर करण्यासाठी निवड समितीवर दबाव वाढला आहे.
निवड समितीची बैठक रविवारी होणार असून, इंग्लंडविरुद्ध 11 जानेवारी रोजी राजकोट येथे होणा-या पहिल्या वनडेसाठी चेतेश्वर पुजाराला संधी मिळू शकते.
पुजाराला मिळू शकते संधी : निवड समितीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गंभीर आणि सेहवाग यांच्यापैकी एकाला संघाबाहेर करण्याची दाट शक्यता आहे. महेंद्रसिंग धोनी फलंदाज म्हणून चांगली कामगिरी करीत असल्यामुळे त्याच्या नेतृत्वावर निर्माण झालेले प्रश्न सध्या थंड बस्त्यात आहे. पुजाराला टीममध्ये स्थान मिळणे, जवळपास निश्चित आहे. त्याने राजकोट येथे मध्य प्रदेशविरुद्ध द्विशतक ठोकले होते. यादरम्यान 150 ते 200 दरम्यानच्या धावा त्याने अवघ्या 17 चेंडूंत पूर्ण केल्या होत्या. इतकेच नव्हे तर पहिला सामना राजकोट येथे होणार असून येथेच पुजाराने आपल्या 90 टक्के धावा काढल्या आहेत.
गंभीर, वीरूची सुमार कामगिरी : गंभीरने आपल्या मागच्या 10 वनडेत दोन शतक आणि दोन अर्धशतकांच्या मदतीने 38.80 च्या सरासरीने 388 धावा काढल्या. दुसरीकडे सेहवागने मागच्या 10 वनडेत 23.80 च्या सरासरीने केवळ 239 धावा काढल्या. गेल्या काही दिवसांपासून सेहवाग आणि गंभीर भारताला दमदार सलामी देण्यात अपयशी ठरले आहेत. याचा फटका टीमला बसत आहे.
रहाणेला मिळावी संधी
युवा सलामीवीर अजिंक्य रहाणेला अधिकाधिक संधी देण्याची इच्छा संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीची आहे. मागचे जवळपास एक वर्ष तो 50 षटकांच्या खेळात बेंचवरच बसला आहे. असे असले तरीही अनुभवाचा विचार करून सेहवाग किंवा गंभीरपैकी एकाचे स्थान संघात कायम राहू शकते. निवड समितीच्या नजरा मुरली विजय आणि अभिनव मुकुंद यांच्यावरही असतील. पालमच्या मैदानावर भारत अ संघाकडून हे दोघे इंग्लंडविरुद्ध खेळणार आहेत.





