पोलिसांची कर्तव्यतत्परता

राज्यातील लोकसंख्येच्या मानाने पोलिसांची संख्या कमी असल्याने गुन्ह्याची उकल करण्यास त्यांना वेळ लागतो. मात्र गुन्ह्याची उकल केल्याशिवाय पोलिस राहत नाहीत असे म्हटले जाते. विलंब झाला तरी पोलिस गुन्ह्याचा छडा लावतात. आणि त्याचा एक चांगला अनुभव आला. 2003 ची गोष्ट. मुंबईतील वांद्रे येथे लोकलमध्ये माझे पाकीट मारण्यात आले होते. मी ताबडतोब रेल्वे पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पाकिटात रोख रक्कम, ओळखपत्र, क्रेडिट कार्ड आदी होते. तक्रार नोंदवल्यानंतर पाकीट परत मिळेल याची आशा नसल्याने मी ती गोष्ट नंतर विसरून गेलो. परंतु अचानक परवा म्हणजेच 2 जानेवारी 2013 ला वांद्रे रेल्वे पोलिसांकडून मला एक पत्र आले. पत्र वाचताच मला पोलिसांच्या कर्तव्यतत्परतेचे कौतुक वाटले. पत्रात माझा मुद्देमाल म्हणजेच फक्त रोख रक्कम पोलिसांच्या हाती लागली असून ती घेऊन जावी असे लिहिलेले होते. खरे तर मी अपेक्षाच सोडली होती. परंतु दहा वर्षांनंतर का होईना पोलिसांनी माझ्या तक्रारीची दखल घेऊन मला रोख रक्कम परत करण्याबाबत आठवणीने पत्र पाठवले त्याचे मला प्रचंड कौतुक वाटले. सध्या सगळ्यांचा पोलिसांवरचा विश्वास उडू लागला आहे, परंतु पोलिसांच्या अशा कामगिरीमुळे पुन्हा त्यांच्यावर विश्वास ठेवावा असे वाटू लागले. पोलिसांना अनेक दिव्यांतून जावे लागते. सध्या त्यांच्यावर कामाचा ताण तर आहेच, शिवाय त्यांना सुट्याही मिळत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावरील ताण आणखीनच वाढतो. अशा स्थितीतही मोठ्या कर्त्यव्यदक्षतेने पोलिस काम करतात. प्रामुख्याने ते ज्या संयमाने काम करतात ते पाहता त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. माझे पाकीट नऊ वर्षांनी मिळाले म्हणून मी ही स्तुती करतो आहे असे नाही तर एक नागरिक म्हणून शांत डोक्याने विचार केल्यास ही बाब पटते.





