आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुमारे 20 वर्षे अफगाणिस्तानात राहिल्यानंतर अमेरिकन सैन्य परतले आहे. अमेरिकन सैन्याच्या तुकड्यांच्या रवानगीसोबतच वृत्त आले की, तालिबान्यांचा खात्मा करण्यासाठी पाश्चिमात्य देशांसोबत मिळून युद्ध लढविणा-या अमेरिकेने पुन्हा अफगाणिस्तानाच्या बर्याच भागांचा ताबा घ्यायला सुरूवात केली आहे.
अनेक दशकांच्या युद्धानंतर अफगाणिस्तान पुन्हा एकदा गृहयुद्धांच्या छायेत आहे. दैनिक भास्करने अफगाणिस्तानातील सद्यस्थिती आणि तेथील सामाजिक-राजकीय गोंधळाविषयी सखोलपणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. काबुलमधील हा ग्राऊंड रिपोर्ट...
सध्या काबूलकडे जाणा-या प्रत्येक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चेकपोस्ट आहेत आणि अतिशय कडक सुरक्षा तपासणी केली जात आहे. अमेरिकेच्या सैनिकांनी रात्री बगराम एअरबेस रिकामा केल्याच्या बातमीनंतर काही दिवसांनी पासपोर्ट कार्यालयांच्या बाहेर मोठ्या रांगा लागल्या. या रांगेत असलेल्या लोकांच्या मते, अमेरिकेने माघार घेतल्यानंतर तालिबान परतणार हे नक्की आहे. आणि होणा-या गृहयुद्धातून स्वतःचा बचाव करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे देश सोडून जाणे हाच आहे.
परंतु, अफगाणिस्तानासारख्या अत्यंत गरीब देशात फारच थोड्या लोकांजवळ हा देश सोडून जाण्याचा पर्याय आहे. उर्वरित लोकांना येथे राहून त्रास सहन करावा लागणार आहे. तालिबानी शासन येण्याची भीती सामान्य लोकांच्या चेह-यावर आणि त्यांच्या वागण्यातून स्पष्ट दिसत आहे. दुर्गम भागांव्यतिरिक्त काबुलसारख्या शहरातही लोक मोठ्या प्रमाणात गरजेच्या वस्तू साठवून ठेवत आहेत. चिंतेची बाब म्हणजे, दहा दिवसांत वस्तूंच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आणि अनेक जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. काबूलचे हे चित्र संपूर्ण देशाची परिस्थिती सांगते. अलीकडेच मी देशाच्या उत्तर भागाला भेट दिली. तिथेही अशीच परिस्थिती आहे.
देशाचे केंद्र सरकार स्वतः जनतेत शस्त्रे वाटप करीत आहे
आज नाही तर उद्या अमेरिकन सैन्य अफगाणिस्तान सोडून निघून जाईल, ही गोष्ट अफगाणिस्तानमधील प्रत्येक सामान्य व्यक्तीच्या मनात होती, पण लोकांना आशा होती की, अमेरिकन सैन्य परतण्यापूर्वी अफगाणिस्तानात शांतता आणि राजकीय स्थैर्यासाठी काही सूत्र सापडेल. यासाठी कतारमध्येही एक बैठक घेण्यात आली होती, ज्यामध्ये तालिबानीही सहभागी होते. देशातील विद्यमान केंद्र सरकारमध्ये तालिबानांचे प्रतिनिधित्व करण्याचा काही मार्ग सापडले, जो सर्वमान्य असेल, अशी अपेक्षा व्यक्त केली गेली होती. पण अमेरिकेने काहीही केले नाही आणि आता त्यांचे सैन्य हा देश सोडून गेले आहे.
आता अफगाणिस्तानातील केंद्र सरकारच्या हाताबाहेर परिस्थिती गेली आहे. त्यांचे शासन केवळ हेरात, कंधार, कुंदूज आणि काबुल प्रांतातील काही प्रमुख शहरांमध्ये टिकून आहे. तालिबानचे सशस्त्र लोक दररोज कोणत्या ना कोणत्या भाग जाऊन आपल्या सरकारची घोषणा करीत आहेत.
परिस्थिती अशी बनली आहे की, प्रत्येक व्यक्तीला असे वाटते की आता सरकार नव्हे, तर केवळ स्वतःचे हत्यारच त्याचे संरक्षण करू शकतात. या मानसिकतेमुळे, अनेक दशकांपासून संघर्ष करणार्या अफगाणमधील मोठ्या लोकसंख्येसाठी शस्त्रे आज आवश्यक झाली आहेत. उत्तर अफगाणिस्तानातील परिस्थिती अशी आहे की, आपल्याला इथल्या प्रत्येक घरात आधुनिक शस्त्रे आढळतील. तालिबानच्या स्वतःच्या नेटवर्ककडे मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा आहे.
ज्यांच्याकडे शस्त्रे नाहीत त्यांना आता उघडपणे शस्त्रे दिली जात आहेत. यासाठी दोन स्त्रोत आहेत. देशातील केंद्र सरकारच आता सर्वसामान्यांना शस्त्रे आणि दारूगोळा वितरीत करीत आहेत, जेणेकरून ते त्यांच्या वतीने तालिबानविरुद्ध लढा देऊ शकतात.
याशिवाय स्थानिक जमातीतील नेते, ज्यांना वॉर लॉर्ड्स आणि सोशल कमांडर म्हणतात, ते ना देशाच्या सरकारबरोबर आहेत ना तालिबान बरोबर. त्याऐवजी हे लोक गट तयार करतात आणि काही भाग व्यापतात आणि तिथे त्यांचे सरकार चालवतात. त्यांना भीती आहे की, जर लष्करी सामर्थ्याच्या जोरावर तालिबान्यांनी संपूर्ण देश ताब्यात घेतला तर त्यांचे अस्तित्व संपुष्टात येईल.
अशा परिस्थितीत हे गट लोकांना शस्त्रे पुरवत आहेत आणि तालिबानशी लढण्याची प्रेरणाही देत आहेत. अशा लोकांमध्ये अनेक कट्टरपंथी आणि जिहादी गट आहेत. हे गट तालिबानप्रमाणे कट्टरपंथीय आहेत, परंतु तालिबानच्या बॅनरखाली येण्याऐवजी त्यांना त्यांची सत्ता चालवायची आहे.
जगभरातील सामरिक तज्ज्ञ अफगाणिस्तानात गृहयुद्ध होणार असल्याची चर्चा करीत आहेत, परंतु प्रत्यक्षात त्याची सुरुवात झाली आहे. देशाच्या उत्तरेकडील भागातून येणार्या अहवालांवरून असे सूचित होते की, तालिबान येथे पुढे सरकत आहे. तालिबान आणि त्याचे विरोधक यांच्यात बलख, बदाखशां यासारख्या भागात संघर्ष आणि जीवितहानी झाल्याचे वृत्त आहे. काबूलमध्ये अद्याप याची जाणीव झाली नसली तरी देशाच्या दुर्गम भागात युद्ध सुरू झाले आहे.
देशातील ब-याच भागात युद्ध सुरु आहे किंवा तालिबान्यांनी कब्जा तरी केला आहे तालिबान देशाच्या उत्तरेकडील भाग ताब्यात घेत आहे. युद्धाच्या भीतीने उत्तर जिल्ह्यातील हजारो लोक आपली घरे सोडून पळून गेले आहेत आणि त्यांची रिक्त घरे तालिबानच्या सुरक्षा चौक्या बनली आहेत. उत्तरेकडील भागात तालिबान्यांचे लक्ष यासाठी आहे, कारण येथील पश्तुन नागरिक करो या मरोच्या स्थितीत त्यांच्यासह सामील होतात.
तज्ज्ञांचे मत आहे की, पुढील महिन्याभरात परिस्थिती अशी असेल की देशाच्या बाहेरील भाग आणि काही सीमा जिल्हे तालिबानच्या ताब्यात असतील. केवळ हेरात, कुंदुज, काबुल आणि कंधार प्रांतांच्या राजधानी केवळ सरकारच्या अखत्यारीत राहतील. आणि जर तालिबान्यांनी तसाच वेग कायम ठेवला आणि त्यांना कोणत्याही तीव्र प्रतिकाराचा सामना करावा लागला नाही तर येत्या सहा महिन्यांत काबुलसह संपूर्ण देश तालिबानच्या नियंत्रणाखाली जाईल, कारण त्यात प्रशिक्षित लोक आहेत. तालिबान कमांडरने तर दावा केला आहे की त्यांनी देशाच्या 80% भाग ताब्यात घेतला आहे. हा दावा पूर्णपणे खरा नसला तरी अफगाण सैन्य आणि तालिबान यांच्यात सुमारे 80% भागात चकमकी सुरू आहेत हे नाकारता येऊ शकत नाही.
तालिबान्यांच्या भीतीने पलायन सुरू
लोक सध्या देशाच्या अशा भागात येण्याचा प्रयत्न करीत आहेत जिथे सध्या संघर्ष होण्याची शक्यता नाही. उदाहरणार्थ, जर कुंदुज भागात लढाई तीव्र झाली, तर लोक तखारच्या दिशेने वाटचाल करतात, जर तखारमध्ये युद्ध सुरु झाले तर लोक बदाखशांच्या दिशेने जातील. पारवान प्रांतातील जिल्हे आणि खेड्यांमध्ये लढाई सुरू आहे. येथून मोठ्या संख्येने लोक तारेकान प्रांताकडे गेले आहेत.
आम्ही सीमाभागातील लोकांचे मोठे मुवमेंट पाहिले आहे. उत्तर अफगाणिस्तानात लढाई तीव्र होत असताना, लोक शेजारच्या ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानमध्येही स्थलांतर करीत आहेत. आता अफगाणिस्तानाचा दुर्गम भाग सोडून काबुलकडे परतुया. इथल्या राजकीय गटांमध्ये युद्ध आणि शांततेच्या चर्चा सुरू आहेत. तालिबान आणि केंद्र सरकारच्या प्रतिनिधी यांच्यात चर्चांच्या अनेक फे-या झाल्या आहेत, पण त्याचा निकाल लागलेला दिसत नाही.
अफगाण सरकार युद्धाचे व्यवस्थापन करण्यास असमर्थ आहे
तालिबानशी युद्धाच्या धोरणाबाबत अफगाण सरकारचे धोरण कमकुवत असल्याचे दिसून येते. तालिबानच्या हालचाली सुरू आहेत. याचे कारण तालिबानमध्ये अधिक शक्ती आहे असे नाही. याचे खरे कारण म्हणजे केंद्र सरकार युद्धाचे योग्यप्रकारे व्यवस्थापन करू शकत नाहीये.
अफगाण सैन्याचे धोरण असे आहे की, ते प्रांतांच्या राजधानी आणि काबुल आपल्या ताब्यात ठेवतील. या धोरणाचा परिणाम म्हणजे दुर्गम भागात सरकारकडून तालिबानला आव्हान दिले जात नाही, सोशल कमांडर आणि स्थानिक लोकांकडूनच थोड्या फार प्रमाणात त्यांना आव्हान दिले जाते, परंतु तालिबानांना रोखण्यासाठी हे अपुरे आहे.
यावर अफगाण सरकारचा युक्तिवाद असा आहे की, जरी तालिबानने काही जिल्हे ताब्यात घेतले असले तरी तेथे ते चांगली सेवा मिळू देऊ शकणार नाहीत आणि त्यांच्यावर संतापलेले लोक स्वत:च बंडखोरी करतील. परंतु भूतकाळातील अनुभव आणि तालिबान्यांची क्रूर पद्धती पाहता हा युक्तिवाद पोकळ वाटतो.
मग तालिबानला थांबवणार तरी कसे?
आता अफगाणिस्तानात दोन परिस्थिती शक्य आहेत. पहिली अशी की अफगाणिस्तानच्या राजकीय आणि आदिवासी नेत्यांनी आपले वैयक्तिक हित बाजूला ठेवून अफगाणिस्तानच्या भविष्यावर लक्ष केंद्रित करून एकत्र यावे. हे दोन्ही नेते एकत्र आल्यास तालिबानविरुद्ध एक शक्तीशाली आघाडी म्हणून समोर येऊ शकतात. त्यांनी ठरवल्यास हे युद्ध वेळीच थांबवता येईल. यानंतर एक अशी यंत्रणा स्थापित करावी जेणेकरून पुढे युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण होणारच नाही. यात यश मिळेलच असे नाही. पण, प्रयत्न नक्कीच करून सकारात्मक यशाची अपेक्षा केली जाऊ शकते.
दुसऱ्या परिस्थितीत आदिवासी नेते आणि राजकीय पुढारी आपल्या वैयक्तिक आकांक्षांवर कायम राहत असतील. अशात अफगाणिस्तानमध्ये वेग-वेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नेत्यांचे वर्चस्व दिसून येईल. तसे झाल्यास तालिबान परत येऊन त्या छोट्या-छोट्या वसाहतींना लक्ष्य करणार आणि गृहयुद्ध सुरूच राहणार अशी शक्यता आहे.
उत्तरेकडील बल्ख प्रांतात ताझिकिस्तान वंशाचे कमांडर अता मोहम्मद नूर जुन्या गोष्टी विसरून तालिबानच्या विरोधात एक होण्याचे आवाहन करत आहेत. त्यांनी माजी परराष्ट्र मंत्री सलाउद्दीन रब्बानी आणि मार्शल अब्दुल रशीद दोस्तम अशा लोकांसोबत उभे राहणार असल्याचा संदेश देखील पाठवला आहे.
परंतु, हे प्रयत्न कितपत यशस्वी ठरतील हे येणारा वेळच सांगू शकेल. अफगाणिस्तानातील सद्यस्थिती अस्थिर आणि हिंसक आहे. तालिबान आणि स्थानिक आदिवासी समूह तुकड्यांमध्ये सशस्त्र संघर्ष सुरू आहेत. हे लोक काबुल पर्यंतही पोहोचतील. अशात सरकार काही करू शकेल असे लोकांना वाटत नाही. दूरवरच्या भागांमध्ये फडकणारे तालिबानी झेंडे लोकांच्या कटु आठवणींना उजाळा देत आहेत. नागरिकांना आशेचा किरण सुद्धा दिसत नाही.
हसीबुल्लाह तरीन काबुलमध्ये वास्तव्याला असून ते राजकीय विषयांवर लिहित असतात. दैनिक भास्कर रिपोर्टर पूनम कौशल यांनी अफगाणिस्तानच्या सद्यस्थितीवर त्यांच्याशी बातचीत केली. त्यावरच हा रिपोर्ट आधारित आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.