आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सकाळचे आठ वाजलेले. बलेसरियांच्या घराजवळचा परिसर पीपीई किट्सने निळाशार झालेला. गेले वर्षभर सगळ्यांच्या परिचयाचे झालेले हे किट्स घालून चाललेली लगबग कोणत्याही कोविड कक्षातील नव्हती. पीपीई किट्स घालून सज्ज ही फौज पोल्ट्रीतील बर्ड किलिंग ऑपरेशनसाठी. पाच जिल्ह्यांतील ९५ पथके यासाठी नवापूरला आली आहेत. प्रत्येक पथकात पाच सदस्य. साधारण साडेचारशे कर्मचाऱ्यांचा जथ्था. सोबत जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी तळ ठोकून बसलेले. अस्वस्थ होते ते बहात्तर वर्षांचे समदभाई बलेसरिया. डोळ्यादेखत कोट्यवधींच्या कोंबड्या, अंडी आणि पशुखाद्याचा माल खड्ड्यात गाडला जात असताना असहायपणे पहात होते.
पंधरा वर्षांपूर्वी आलेल्या बर्ड फ्लूच्या साथीत त्यांच्या सकिस्मा पोल्ट्रीची अशीच धूळदैना झाली होती. मात्र, यंदा कोरोना, लॉकडाऊन या संकटातून उठत असतानाच बर्ड फ्लूचा हा तिहेरी झटका त्यांच्या सहनशीलतेच्या पलीकडे गेला आहे. महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांना दररोज अाठ लाख अंड्यांचा पुरवठा करणाऱ्या नवापुरातील २७ पोल्ट्रींपैकी २२ पोल्ट्रींमधील पाच लाख कोंबड्यांचे किलिंग ऑपरेेशन पूर्ण करण्यात आले आहे. एक कोंबडी वाढविण्यासाठी खर्च येतो ४१० रुपये, पण नुकसानभरपाई मिळणार आहे फक्त ९० रुपये. अंड्याला तर तीनच रुपये. नुकसान मात्र कोट्यवधी रुपयांचे. दुपारी बारानंतरही ऑपरेशन सुरूच होते. काही कर्मचाऱ्यांना मळमळण्याचा त्रास होत होता. तैनात पथक त्यांच्यावर तत्काळ उपचार करीत होते.
असे आहे किलिंग ऑपरेशन
प्रथम पीपीइ कीट्स घालून आणि टॅमी फ्लूच्या गोळ्या खाऊन पथक तयार होते. त्याचवेळी पक्ष्यांनाही बेशुद्ध करण्यासाठी औषध दिले जाते. अर्ध्या तासाने ते मारून पोत्यात भरले जातात. पोती ट्रॅक्टरवर लोड करून पोल्ट्रीच्या आवारात जेसीबीने केलेल्या खड्ड्यात ते पुरले जातात. जंतुनाशके फवारून खड्डा बंद केला जातो. अशाचप्रकारे अंड्यांचीही विल्हेवाट लावली जाते. पोल्ट्रीच्या आवारातील पशुखाद्य व इतर कच्चा मालही नष्ट केला जात आहे. चार-पाच दिवस चालणाऱ्या या ऑपरेशनमध्ये संपूर्ण पोल्ट्री परिसराचे निर्जंतुकीकरण केले जाते.
११ नमुने भोपाळला...
नवापूर तालुक्यातील पोल्ट्री बाॅयलर कोंबड्यांच्या नाहीत तर अंडी देणाऱ्या कल्स कोंबड्यांच्या आहेत. सात पोल्ट्रींचे ११ नमुने तपासणीसाठी भोपाळला आयसीएआरला पाठविले आहेत.
पशुखाद्य तरी वाचवा, फक्त सील करा
माझ्या तीन शेडमधील लाखाच्या वर पक्षी तर गेले, पण पशुखाद्य आणि कच्चा माल सील करून टाकावा, जाळू नका एवढीच माझी सरकारला कळकळीची विनंती आहे. आत्ता चार हजार टनाच्या आसपास माल पडून आहे. तोही नष्ट केला तर सारंच संपेल. - समद बलेसरिया, पोल्ट्रीमालक
घाबरू नका, माणसांना धोका नाही
गेल्या वेळी संसर्ग झालेला बर्ड फ्लू एच ५ एन १ या प्रकारचा होता. यावेळचा एच ५ एन ८ या प्रकारचा आहे. हा पक्ष्यांमध्ये वेगाने पसरतो, मात्र माणसांमध्ये त्याचा प्रादुर्भाव नगण्य आहे. भारतात अजून तसे आढळून आलेले नाही. ऑपरेशनमधील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात येत आहे. - डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हाधिकारी, नंदुरबार
भरपाई वाढल्यास भार हलका
पशुखाद्यासाठी लागणारे मका, ज्वारी, सोयाबीन, औषधे सारेच महाग झाले आहे. नष्ट करण्यात येणाऱ्या पशुखाद्याला सरकार सध्या किलोमागे १२ रुपये नुकसानभरपाई देत आहे. ती किमान ३२ रुपये किलो दिली तर नुकसानीचा भार हलका होईल. -आरिफ बलेसरिया, अध्यक्ष, नवापूर पोल्ट्री असोसिएशन
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.