आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राच्या संकटाची कहाणी:भाजपने एमएलसी निवडणुकीत गदारोळ करून उद्धव यांची दिशाभूल केली, शिंदेंना मुंबई सोडण्यास मदत केली

आशिष राय,मुंबई\अंकिता जोशी,इंदूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उजवा हात मानल्या जाणाऱ्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी अखेर बंडखोरी केली. एकेकाळी बाळासाहेबांचे खास असणारे शिंदे मुंबईहून रातोरात शिवसेनेचे 15, राष्ट्रवादीचा 1 व 14 अपक्ष आमदारांना घेऊन सुरतच्या ला मेरिडियन हॉटेलवर पोहोचले. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपच्या एका बड्या नेत्याने या आमदारांना मुंबईहून सुरत गाठण्यासाठी मदत केली. यातील काही आमदार विशेष विमानाने तर काही रस्तेमार्गाने सुरतला पोहोचवण्यात आल्याची एक्सक्लूझिव्ह माहिती दिव्य मराठीला मिळाली आहे. ही बातमी लीक होऊ नये म्हणून मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सुरक्षा रक्षकांनाही घरी पाठवले होते.

विधान परिषद निवडणुकीपूर्वीच ठरली स्क्रिप्ट
सूत्रांच्या माहितीनुसार, सुरत पलायनाची संपूर्ण स्क्रिप्ट सोमवारी झालेल्या विधान परिषद निवडणुकीच्या 2 दिवस अगोदर ठरली होती. निवडणुकीतील भाजपच्या धक्कातंत्रानंतर ती प्रत्यक्ष अंमलात आणण्यात आली. भाजपने मतमोजणीत क्रॉस व्होटिंग झाल्याचा गवगवा करत आकांडतांडव माजवले. यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे लक्ष तिकडे वेधले गेले. याचाच फायदा घेत शिंदे व त्यांचे समर्थक आमदार हळूच सुरतला रवाना झाले.
उद्धव यामुळे झाले शिंदेंवर नाराज
एकेकाळी शिवसेनेशी जवळीक असणारे व सध्या मनसेचे थिंक टँक म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार वागीश सारस्वत यांनी सांगितले की, 'शिंदेंची बंडखोरी एका रात्रीतून घडली नाही. उद्धव ठाकरे यांच्याकडून सातत्याने होणारी हेटाळणी व दुर्लक्षामुळे असे घडले.'
महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेवेळी एकनाथ शिंदेंचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आले. पण, मुख्यमंत्रीपदी स्वतः उद्धव ठाकरे बसले. तर शिंदेंकडे नगरविकास मंत्रालय सोपवण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री व त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्या मंत्रालयातील वाढत्या हस्तक्षेपामुळेही शिंदे दुखावले गेले होते. बिल्डर लॉबीशी संबंधित अनेकजण थेट मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्या कामात अडथळे निर्माण करत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

अन्य आमदारही उपेक्षेमुळे होते नाराज
सारस्वत यांनी सांगितले की, 'शिंदेंसोबत बंडखोरी करणारे सर्वच आमदार महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील आहे. त्यांच्या भागात त्यांना शिवसेनेच्या नावाचा कोणताही फायदा होत नाही. ते कोणत्याही पक्षात असले तरी स्वतःच्या बळावर निवडून येतात.'
'त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्र्यांकडून केल्या जाणाऱ्या अवहेलनेमुळे ते दुखावले गेले होते. त्यांनी अनेकदा आपल्या मतदार संघासाठी निधी दिला जात नसल्याची तक्रार केली होती. शिंदे शिवसेनेचे एक दिग्गज नेते आहेत. त्यामुळे या नाराज आमदारांनी त्यांच्यासोबत सुरत गाठणे पसंत केले.'
शिंदे गटाच्या मते, 'आता शिवसेना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुंबई, संजय राऊत व आदित्य ठाकरे यांच्यापुरती मर्यादित झाली आहे. मुख्यमंत्री शिवसेनेच्या नेत्यांपेक्षा राष्ट्रवादीचे मंत्री व आमदारांना प्राधान्य देत आहेत.'
शिंदेंच्या बंडामागे फडणवीसांची मैत्री आहे का?
'ऑपरेशन लोटस'चे सर्वात मोठे पात्र असणारे एकनाथ शिंदे व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील मैत्री सर्वश्रूत आहे. फडणवीस सरकारमध्ये शिंदेंकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार होता. बाळासाहेबांच्या निधनानंतर शिंदे, भाजप व शिवसेनेतील एक महत्वाचा दुवा होते. समृद्धी महामार्गाच्या महत्वकांक्षी योजनेवेळी शिंदे व फडणवीसांतील राजकीय मैत्री अधिकच मजबूत झाली. याच मैत्रीचे रुपांतर आताच्या बंडखोरीत झाले आहे.
ताकदवान नेते असूनही पक्षात हेटाळणी

  • एकनाथ शिंदे ठाकरे कुटुंबानंतरचे शिवसेनेतील सर्वात ताकदवान नेते आहेत. त्यांनी 1980 मध्ये शिवसेनेची भगवी पताका हाती घेतली. तेव्हापासून आतापर्यंत 4 वेळा ते ठाण्यातील कोपरी-पांचपखडी मतदार संघातून विधानसभेवर निवडून आले.
  • 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपला फारकत दिल्यानंतर उद्धव यांनी त्यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड केली होती.