आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोनापासून वाचण्यासाठी सतत साबनीने हात धुवा असे सरकार सांगत असले तरी प्रत्यक्षात हे शक्य होत नाहीय. त्याचे कारण म्हणजे राज्यातील ४४ % लोकांना साबनीने हात धुण्याची सवयच नाही. त्यातील सर्वात मोठी अडचण पाण्याची अाहे. तर संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक जागांवर जाणे टाळणे आवश्यक असतांना राज्यातील मोठ्या घटकाला सार्वजनिक शौचालय आणि स्नानगृहाचा वापर करावा लागतो. यामुळे संसर्ग कमी होण्याऐवजी वाढण्याचाच धोका आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाबाधीत रूग्ण महाराष्ट्रात आहेत. कोरोनापासून वाचवण्यासाठी स्वच्छतेला महत्त्व आहे. बाहेरून आल्यावर हात, अंगावरील कपडे धुणे आवश्यक आहे. तर दर दोन तासांनी २० सेकंदांपर्यंत साबनाने हात स्वच्छ धुण्याचा सल्ला दिला जातो. यंदाच्या उन्हाळ्यात लॉकडाऊनमुळे कुटूंबातील सदस्य अधिक वेळ घरात राहू लागले. पाण्याची मागणी वाढली. सतत हात धुण्यासाठी पाणी मिळवतांना दमछाक होवू लागली. राज्यातील ६१२ गावे आणि ११४५ वाड्यांमध्ये ५९७ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. तर राष्ट्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाच्या पाहणीनुसार शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही भागातील पाणी टंचाईमुळे नागरीकांना सतत हात धुणे कठीणच आहे.
कसा टळणार संसर्ग
कोरोना टाळण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंगला खूप महत्त्व आहे. पण राज्यातील स्थिती बघता अनेक ठिकाणी याचे पालन शक्य होत नाही. अनेकांना पाणी नसल्याने सतत हात धुता येत नाही. सार्वजनिक ठिकाणांचा वापर करण्याशिवाय पर्याय नाही. -गौरी कुलकर्णी, संशोधक, सेंटर फाॅर एन्व्हाॅयर्नमेंट एज्युकेशन, रिसर्च अँड अवेअरनेस (सेरा)
फक्त पाण्याने धुतात हात
युनिसेफच्या वॉटर, हायजीन अॅण्ड सेनिटेशन या उपक्रमाअंतर्गत हात धुण्याचे महत्त्व आणि पद्धत सांगीतली जाते. पण अजूनही ४०.४ % नागरीक फक्त पाण्याने हात धुतात. २.५% नागरीक राख किंवा मातीने हात धुतात तर ०.६ % लोक हातच धुत नाहीत. समाधानाची बाब म्हणजे ५६.५% लोकं साबनीने हात धुतात.
सार्वजनिक स्नानगृहांचा वापर :
कोरोना टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळणे आवश्यक आहे. परंतु १३.३% नागरिक सार्वजनिक शौचालयाचा तर २०.८% लोक सार्वजनिक स्नानगृहाचा वापर करतात. या ठिकाणी नळ, बादली, दाराची कडी यास अनेक जणांचा स्पर्श होतो. यामुळे संसर्गाचा धाेका बळावतो.
पिण्याचे पाणीही दुरापास्त
राज्यातील ६७.५ % घरांच्या आत नळ आहे. तर २८.८% घरांच्या आवारात नळ आहे. हा नळ त्यांना घरातील अन्य कुटूंबियांसोबत वापरावा लागतो. तब्बल १४.८% नागरीक २०० मीटरपर्यंत तर ४.२% नागरीक पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी घरापासून अर्धा किलोमीटरपर्यंत जातात.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.